सातारा – शाहूपुरी व परिसरात गेल्या चार दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग पिवळसर असल्याने या पाण्याच्या शुध्दतेबाबत नागरिकांच्या मनात शंका निर्माण झाली आहे. याबाबत आलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने धरणातील व अन्य पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शाहूपुरी व परिसरात कण्हेर योजनेचे पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून देण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून नळाद्वारे येणाऱ्या पाण्याचा रंग पिवळसर असल्याच्या स्थानिक नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना भारत भोसले यांनी निवेदन दिले असून दूषित पाणी पुरवठा होऊ नये यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. गेले चार दिवस शाहूपुरीस पुरवठा होणाऱ्या पाण्याचा रंग पिवळसर येत असून यामुळे नागरिकांचे मनात पाण्याच्या शुद्धतेबाबत शंका निर्माण झाली असल्याने या शंकांचे निरसन करावे, अशी मागणी श्री. भोसले यांनी केली आहे.
वास्तविक पाहता दर मंगळवारी फिल्ट्रेशन टॅंक व इतर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यासाठी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. तरीसुध्दा अशा पध्दतीने पिवळसर रंगाचे पाणी येणे योग्य नाही. मागील वर्षी सुध्दा अनेक दिवस हाच प्रश्न नागरिकांना त्रासदायक ठरला होता. ही बाब गांभीर्याने घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी भोसले यांनी केली होती. या तक्रारीची दखल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतली आहे. धरणासह इतर पाणी लॅबमध्ये टेस्टिंगसाठी पाठविण्यात येणार असून त्याचा अहवाल येताच या पिवळसर रंगाबाबतची नेमके कारण जाणून घेऊन त्याप्रमाणे पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यासाठी जंतुनाशक डोसची कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती कण्हेर पाणी पुरवठा यंत्रणा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली.