कोपरगाव -यंदा उसाची रिकव्हरी कमी असली, तरी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना रिकव्हरीपेक्षा, तसेच इतरांपेक्षा वाढीव दर देणार असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी सांगितले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24च्या गळीत हंगामाचा प्रारंभ आज (बुधवार) संचालक निवृत्ती बनकर व त्यांची पत्नी मंदाताई बनकर यांच्या हस्ते, बिपीन कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व अध्यक्ष कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात झाला.
त्या वेळी ते बोलत होते. प्रारंभी बिपीन कोल्हे व विवेक कोल्हे यांनी कारखान्याचे संस्थापक, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. प्रास्ताविकात कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी कारखान्याने गेल्या 61 वर्षांत केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला.
या वेळी विवेक कोल्हे म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारी ही तीनचाकी गाडीप्रमाणे चालते. कारखाना व्यवस्थापन व कामगार, ऊस उत्पादक आणि सरकारचे धोरण यावर सहकार चालतो. राज्यात दोनशे पेक्षा अधिक सहकारी साखर कारखाने होते. त्यापैकी निम्मे कारखाने बंद झाले. 25 ते 30 सहकारी कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सहकारमध्ये अनेक आव्हाने असताना त्यात नैसर्गिक आपत्तीची भर पडल्याने चालू गळीत हंगाम सहा महिन्यांऐवजी केवळ तीन महिने चालण्याची शक्यता आहे. उसाची कमतरता असली, तरी सात लाख मेट्रिक टन उसाच्या गाळपाचे उद्दिष्ट कोल्हे कारखान्याचे आहे, तर 90 लाख लिटर इथेनॉल सरकारला पुरवठा करण्याचे टेंडर भरणार आहे, असे सांगितले.
या वेळी बिपीन कोल्हे म्हणाले की, स्व. शंकरराव कोल्हे यांनी पाणी, शेती व सहकारी संस्था व मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. सन 2005चा समन्यायी पाणी वाटप कायदा नगर, नाशिक जिल्ह्यांसाठी अन्यायकारक असून, यंदा या दोन्ही जिल्ह्यात भीषण दुष्काळ असताना जायकवाडीत पाणी सोडण्याचा अट्टहास कशासाठी? गोदावरी खोरे हे महाराष्ट्रातील सर्वांत मोठे खोरे असून, पश्चिमेचे पाणी पूर्वेकडे गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा प्रकल्प त्वरित पूर्ण होण्यासाठी नगर, नाशिकसह मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून सरकारवर दबाव आणावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.
या वेळी ज्येष्ठ नेते दत्तात्रयनाना कोल्हे, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष नितीन कोल्हे, संचालक रमेश घोडेराव, बाळासाहेब वक्ते, त्र्यंबकराव सरोदे, अप्पासाहेब दवंगे, ज्ञानेश्वर परजणे, बापूसाहेब बारहाते, नीलेश देवकर, ज्ञानदेव औताडे, राजेंद्र कोळपे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर होन, विलासराव वाबळे, विलासराव माळी, सतीश आव्हाड, निवृत्ती बनकर, बाळासाहेब पानगव्हाणे, संजय औताडे, अरुण येवले, साहेबराव कदम, शिवाजीराव कदम, संजय होन, साईनाथ रोहमारे, मधुकर वक्ते,
विजय दंडवते, बाबासाहेब डांगे, डॉ. एकनाथ गोंदकर, गंगाधरराव चौधरी, रविकाका बोरावके, शिवाजीराव देवकर, प्रदीप गुरव, विवेक शुक्ला, अभियंता के. के. शाक्य, वर्क्स मॅनेजर भिसे, कामगार अधिकारी चिने आदी उपस्थित होते. साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव टी. आर. कानवडे व संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. या वेळी सूत्रसंचालन संचालक विश्वासराव महाले यांनी केले. उपाध्यक्ष मनेष गाडे यांनी आभार मानले.
आ. काळेंनी राजीनामा द्यावा
या वेळी कोल्हे पिता-पुत्राने चौफेर टोलेबाजी करत आ. आशुतोष काळे यांच्या निष्क्रियतेचा पंचनामा करत त्यांच्यावर घणाघाती टीका केली. माजी आ. अशोक काळे व आ. आशुतोष काळे यांच्यामुळे तालुक्याला हक्काचे पाणी गमवावे लागले असून, त्यांनी आता राजकारण करून जनतेला वेड्यात काढू नये. काळे पिता-पुत्रांच्या स्वार्थी राजकारणामुळे कोपरगाव मतदारसंघाचे पार वाटोळे झाले आहे. मतदारसंघासाठी तीन हजार कोटींचा निधी आणल्याचा गाजावाजा करणारे आ. काळे पाणीप्रश्न सोडविण्यात पूर्णत: अपयशी ठरल्याचा आरोप करून शेतकऱ्यांप्रती खोटा कळवळा दाखविण्यापेक्षा त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कोल्हे यांनी केली.