मुंबई – टीम इंडियाचा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वालने पदार्पणाच्या कसोटीत (171) आपली छाप सोडली. डॉमिनिका येथील विंडसर पार्क येथे वेस्ट इंडिजविरुद्ध पदार्पणात शतक झळकावल्यानंतर जयस्वाल प्रसिद्धीच्या झोतात येत आहे. यशस्वी सध्या क्रिकेट सोडून आणखी एका कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याने मुंबईत ५ बीएचके घर घेतले आहे. आपल्या पहिल्याच कसोटीत शानदार खेळी खेळून यशस्वी जयस्वालने आपल्या कुटुंबाला स्पेशल गिफ्ट दिल आहे.
आज केवळ जयस्वालचे कुटुंबीयच नाही तर देशभरातील क्रिकेटप्रेमी 21 वर्षीय खेळाडूची नवी सुरुवात पाहून खूप आनंदित आहेत, त्याचा संघर्ष अनेकांना प्रेरणा देणारा आहे. यशस्वी जयस्वालने कधी झोपड्यात रात्र काढली आहे तर कधीकाळी पाणीपुरी विकून उदरनिर्वाह केला, एक वेळ अशी आली की त्याला आझाद मैदानात प्रवेश नाकारण्यात आला. मात्र त्याने कधीच जिद्द सोडली नाही.
यशस्वी सांताक्रूझमधील भाड्याच्या दोन बेडरूमच्या घरात आपल्या कुटूंबासोबत गेल्या दोन वर्षांपासून राहत होता. यशस्वी जैस्वालचे स्वप्न होते कि त्याचे मुंबईत स्वतःचे घर असावे. आणि हे स्वप्न त्याचे पूर्ण झाले. यशस्वी जयस्वालसह त्याचे कुटुंब मुंबईतील 5 BHK घरात स्थलांतरित झाले आहे. खुद्द यशस्वी जैस्वाल यांच्या भावाने ही माहिती दिली आहे. यशस्वीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
यशस्वी जैस्वालला वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळाली आणि इथूनच त्याच्या आयुष्यातील नवा प्रवास सुरू झाला. आपल्या शानदार कामगिरीने त्याने केवळ आपले पदार्पण संपूर्ण देशासाठी संस्मरणीय बनवले नाही, तर या शानदार कामगिरीने आपल्या कुटुंबासाठी पाहिलेली स्वप्ने पूर्ण केली.
झोपडीत झोपणाऱ्या, पाणीपुरी विकणाऱ्या, आयपीएल खेळ पाहण्यासाठी झाडावर चढणाऱ्या २१ वर्षीय तरुणांसाठी ही एक नवीन सुरुवात आहे. यशस्वीने 387 चेंडूत 171 धावा केल्या. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 1 षटकार लगावला. यशस्वी जैस्वालला त्याच्या चमकदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.