राहाता – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे महसूल,पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले आहेत.चांद्रयान-३ चे यशस्वी उड्डाण ही सर्व भारतीयांसाठी मोठी घटना आहे. जगातील अमेरीका आणि रशिया या देशांबरोबरच आता भारताने सुध्दा केलेल्या यशस्वी प्रयत्नांमुळे देश आता बलशाली होत आहे. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांच्या टिमने केलेली ही ऐतिहासिक कामगिरीमुळे देशाची मान उंचावली आहे. एकाच वेळी १०४ उपग्रह अवकाशात पाठविणे विक्रम आज देशाच्या नावावर नोंदला गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आता महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे हे सांगण्यासाठी आता कोणत्या ज्योतीषाची गरज नाही आणि इतर कोणत्याही देशाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. इतर देशाच्या तुलनेत भारत देश आता लष्करी सामर्थ्यामध्येही बलशाली होत असून, मागील ९ वर्षात देशहितासाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळेच आता जगात भारताचे महत्व आधोरेखित झाले असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला नऊ वर्षे पुर्ण झाल्याबद्दल भारतीय जनता पक्षाच्या वतीने महा जनसंपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांच्या माहितीचे पत्रक त्यांनी नागरीकांना वितरीत केले. याप्रसंगी प्रांताधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, गट विकास अधिकारी, जालिंदर पठारे, मुख्याधिकारी तुषार आहेर,जलसंपदा विभागाचे महेश गायकवाड, कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह शासकीय आधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असल्याने केंद्र सरकारची पारदर्शकता जनतेसमोर आली आहे. ९ वर्षात भ्रष्ट्राचाराचा एकही आरोप केंद्र सरकारवर होवू शकला नाही. हाच अभिमान देशवासियांना असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली डबल इंजिनच्या सरकारला आता उपमुख्यमंत्री अजीत पवारांच्या माध्यमातून तिसरेही इंजिन जोडले गेल्याने हे सरकार आता वेगान पुढे जात आहे.
आजच पशुसंवर्धन विभागाने दूधाच्या दरवाढीचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यासाठी नेमलेल्या समितीने प्रतिलिटर ३४ रुपये भाव देण्याची केलेली शिफारस मान्य करुन तसा आदेश शासनाने काढला असून, हे सरकार राज्यातील शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.