जेजुरी -बहुजन बांधवांचा लोकदेव म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या चंपाषष्ठी उत्सवाची मंगळवारी (दि. 29) विविध धार्मिक विधी-तळीभंडाऱ्याचा कुलधर्म कुलाचार होत आणि पुरणपोळी, वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीच्या पिठाचा रोडग्याचा नैवेद्य अर्पण करीत सांगता झाली. यावेळी उपस्थितांनी भंडारा उधळीत “यळ कोट यळ कोट जय मल्हार’ चा गजर केला.
तत्पूर्वी सोमवारी (दि. 28) सायंकाळी गडकोट आवारातून शहराच्या मानाच्या चावडीपर्यंत वाजत गाजत तेलहंड्याची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गणेश आगलावे, संतोष लांघी, विठ्ठल लांघी, बापू लांघी, मुन्ना बारभाई, संजय आगलावे अविनाश सातभाई, सतीश कदम, सुधाकर मोरे, गणेश मोरे, आयुष मोरे, मयूर मोरे, प्रवीण मोरे, रोहन लांघी, दिनेश बारभाई, प्रशांत सातभाई, चेतन सातभाई, अनिल आगलावे, बापू सातभाई, हनुमंत लांघी, देवसंस्थानचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ, मानकरी, पुजारी, सेवेकरी मोठ्या संख्येने या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले होते.
खोमणेपाटील, माळवदकरपाटील यांच्यासह ग्रामस्थांनी श्रींच्या तेलहंड्यात तेल अर्पण केले. यावेळी चावडीमध्ये प्रत्येक मानकरी ग्रामस्थांच्या नावाचा पुकारा करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तेलहंडा गडावर नेण्यात येऊन खंडोबा -म्हाळसादेवी यांना तेलवण करण्यात येऊन हळद लावण्यात आली.
तर मंगळवारी (दि. 29)पहाटेची नित्याची भूपाळी -पूजा अभिषेक झाल्यानंतर सकाळी 8. 30 वाजता मंदिरातील देवांचे घट उठविण्यात आले. देवांना पूरणपोळी, वांग्याचे भरीत, कांद्याची पात, बाजरीच्या पिठाचा रोडग्याचा नैवेद्य अर्पण करण्यात येऊन दिवटी पाजळून, तळीभंडाऱ्याचा कुलधर्म कुलाचार करण्यात आला.
25 हजार भाविकांना प्रसादाचा लाभ
जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र मंडळ यांच्यावतीने सहा दिवस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. चंपाषष्ठीदिवशी भाविकांच्या महाप्रसादासाठी 2 हजार किलो वांगी उपलब्ध करून देण्यात आली होती .दिवसभरात सुमारे 25हजार भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला.