शिक्षण विभाग सज्ज; जिल्ह्यात 49 केंद्रांवर 39 हजार 204 विद्यार्थी देणार परीक्षा
सातारा – बारावीची परीक्षा (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा) मंगळवारपासून (दि. 18) सुरु होत असून ही परीक्षा दि. 18 मार्च रोजी संपणार आहे. या परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सज्ज झाला असून जिल्ह्यातील 49 केंद्रांवर 39 हजार 204 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिली.
सातारा तालुका 10, कराड तालुका 9, पाटण तालुका 4, कोरेगाव तालुका 3, खटाव तालुका 4, खंडाळा तालुका 2, जावळी तालुका 2, फलटण तालुका 5, महाबळेश्वर तालुका 2, वाई तालुका 4, माण तालुका 4 अशी 49 केंद्र आहेत. शिक्षण विभागाच्यावतीने परीक्षेची तयारी करण्यात आली असून परीक्षेसाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, निरंतर शिक्षणाधिकारी, महिला उपशिक्षणाधिकारी यांची प्रत्येकी एक आणि डायट विभागाची दोन भरारी पथके गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नेमण्यात आली आहेत. याचबरोबर परीक्षा केंद्र परिसरात पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे. परीक्षा केंद्र परिसरात 144 कलम लागू करण्यात आल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात कॉपी बहाद्दरांवर झालेल्या कडक कारवायांमुळे आणि याबाबत होत असलेल्या जनजागृतीमुळे संवेदनशील परीक्षा केंद्र जिल्ह्यात एकही नाही. जिल्ह्यात परीक्षेदरम्यान कॉपी करणारांचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून बारावी परीक्षेसाठी जिल्ह्यात एकही उपद्रवी केंद्र नाही. याचबरोबर एकही कुप्रसिध्द केंद्र नाही. त्यामुळे जिल्ह्याची वेगळी ओळख निर्माण होत आहे.
राजेश क्षीरसागर, माध्यमिक शिक्षणाधिकारी, सातारा.