आर्थिक नियोजन ही खरे तर मोठी जबाबदारीची बाब आहे. परंतु त्याबाबत नेहमीच आळस किंवा दुर्लक्ष केले जाते. जेव्हा आपण अनुभवातून गुंतवणुकीचे धडे शिकत जातो तेव्हा आपल्यासमोर निवड़ण्यासाठी असंख्य गोष्टी समोर असतात. अनेकदा त्यातील सर्वोत्कृष्ठ पर्यायाची अचूकपणे निवड करणे जमत नाही. अगदी योग्य वाटणाऱ्या पर्यायात गुंतवणूक करण्यापासून ते गरजांसाठी कर्ज घेण्यापर्यंत अनेक बाबतीत चुकीचे निर्णय घेतल्याचे आपल्याला कालांतराने लक्षात येते. अशा काही सवयींचा तुमच्या गुंतवणुकीवर अनेकदा विपरीत परिणाम होतो.
विम्याचा आढावा घ्या
अनेकांसाठी विमा म्हणजे सुरक्षा कवच असते. बहुतेक जण विमा खरेदी करताना त्यांच्या समोर आलेल्या पर्यायांखेरीज दुसरा विचारच करत नाहीत. तुम्ही विशीत घेतलेल्या विम्यावर 50,00,000 रुपयांचे कव्हर असेल तर त्यावेळी ते पुरेसे असेल पण तुम्ही तिशीत पोचल्यावर ते पुरेसे असेल असे नाही. ठराविक वर्षांनी आपल्याकडील विमा पॉलिसींचा आढावा घेऊन विम्याबाबत नव्या चांगल्या पर्यायांचा स्वीकार करणे ही काळाची गरज आहे. मग तो आरोग्य विमा असो किंवा आयुर्विमा. त्यामुळे तुम्ही मागच्या काळात घेतलेल्या पॉलिसी, युलिप्स या सगळ्यांची विम्याच्या नव्या उत्पादनांशी तुलना करा आणि तुमच्या गरजेनुसार शुद्ध विमा (टर्म इन्शुरन्स) घेण्यास प्राधान्य द्या.
माहिती असणाऱ्या एकाच फंडात गुंतवणूक
अनेकदा आपल्याला माहीत असलेल्या आणि ओळखीच्या फंडात गुंतवणूक केली जाते. तुमचा पोर्टफोलिओ सशक्त होण्यासाठी ही सवय पूरक ठरत नाही. अनुभवी गुंतवणूक सल्लागारांकडून सांगितला जाणारा आणि नेहमीच उपयोगी पडणारा सल्ला म्हणजे सगळी गुंतवणूक एकाच ठिकाणी करू नका. तुमच्या गुंतवणुकीत विविधता हवी.
उद्दिष्टांनुसार गुंतवणूक
कुणी तरी सांगितले आहे म्हणून बरेच जण गुंतवणुकीला सुरवात करतात. अशी गुंतवणूक केवळ नावापुरती ठरते आणि त्यातून फारसे काही हाती लागत नाही. त्यासाठी गुंतवणुकीतून तुमचे उद्दिष्ट काय आहे हे आधी निश्चित करणे गरजेचे असते. मुलांचे शिक्षण, निवृत्तीसाठीचा निधी, घर खरेदी, गाडी खरेदी असे उद्दिष्ट निश्चित करून मग त्यानुसार गुंतवणूक केली तर गुंतवणुकीसाठीचा आपला मार्ग निश्चित होतो आणि आपण योग्य मार्गावरून चालण्यास सुरवात करतो.
– चतुर