कानपूर – जर त्यांची मुलगी माझ्या मुलीच्या जागी असती तर अशा रात्रीच्या भयावह गडद काळोखात त्यांनी अंत्यसंस्कार केले असते का? असा संतप्त सवाल हाथरसमध्ये झालेल्या कथित बलात्कार आणि हत्या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी केला आहे.
या युवतीच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार उरकण्यासाठी पोलिसांनी बळजबरी केल्याचा आरोप पीडितेचे कुटुंबीय करत आहेत. या प्रकरणात पोलीस आणि उत्तर प्रदेश सरकारच्या भूमिकेवर माध्यमे आणि विरोधक प्रश्नचिन्ह उभे करत आहेत.
या पार्श्वभूमीवर, काही स्थानिक माध्यमांनी पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून पीडितेच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आसवांनी डोळे ओसंडून वाहात असताना हुंदके देत ते म्हणाले, अशा पाशवी कृत्याला तिला सामोरे जावे लागले. त्यानंतर पोलिसांनी बळजबरी करत तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. आम्ही फक्त दोन तास थांबा म्हणत होतो, पण त्यांनी ऐकले नाही.
या महिलेला बेदम मारहाण करून तिच्यावर 14 सप्टेंबरला सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिला गंभीर जखमी अवस्थेत सोडून देण्यात आले. सफदरजंग रुग्णालयात त्यांचा मंगळवारी मृत्यू झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. घरात एकदा तरी मृतदेह नेऊ द्या, या त्यांच्या मागणीकडे पोलिसांनी कानाडोळा केल्याचा आरोप कुटुंबीयांकडून केला जात आहे.