ओतूर -येथील भाजी मंडईच्या जागेचा प्रश्न गेली कित्येक दिवसांपासून प्रलंबितच आहे. करोनाच्या नावाखाली प्रसिद्धीसाठी अंतर्गत जागा बदलाचे गलिच्छ राजकारण गावात घडत आहे. भाजी मंडईचा प्रश्न मात्र मार्गी लागत नसल्याने यात विक्रेत्यांचा अक्षरशः फुटबॉल झाला आहे. गेल्या सहा महिन्यांत विक्रेत्यांना तब्बल नऊ जागा बदलाव्या लागल्याने विक्रेत्यांची आर्थिक फरफट होत आहे.
ओतूर (ता. जुन्नर) गावठाणात नियमित भाजी विक्रीचा व्यावसाय करणारे अवघे 15 दुकानदार आहेत; मात्र करोना कालावधीत लॉकडाऊनमुळे रोजगार बुडाला व बहुतांश लोक या भाजी विक्री व्यावसायाकडे वळले आहेत. सद्यस्थितीत 50 च्यावर भाजी विक्रेत्यांची संख्या असून परिसरातील शेतकरी देखील आपआपला शेतमाल पेठेत विक्रीस मांडत असतात.
गेल्या काही महिन्यात ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कक्षेत येणाऱ्या सर्वच लहान मोठ्या गावांमधून करोना रुग्ण वाढत आहे. तोच धागा पकडून कुठेही रुग्ण आढळला की त्याचे खापर जणु भाजी विक्रेत्यांच्या माथी मारण्याचे कुटील कारस्थान रचले जात असल्याचा संशय त्यांच्यातून व्यक्त होत असल्याने विक्रेत्यांमध्ये संताप व्यक्त केला जात असून ग्राहकांमध्येही नाराजी पसरली आहे.
शासनाचे नियमानुसार सोशल डिस्टनसिंगचे पालन करून व रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही अशा बेतात व्यवसाय करण्यास परवानगी असताना तसेच शेतमाल विक्रीस शासनाच्या वतीने कोणताही मनाई हुकूम पारित झालेला नसताना भाजी विक्रेत्यांना वेळोवेळी जागा बदलावी लागते? तसेच यामुळे ग्राहकांनाही मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
उपासमारीची वेळ
सोशल डिस्टन्सिंगचे व्यवस्थित पालन करूनही दुकाने लावण्यास काही ठिकाणी नाहक विरोध केला जात असल्याने आता भाजी विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आल्याचे भाजीविक्रेते सचिन तांबे, रितेश लांडे,
भरत पवार सांगितले आहे.