नवी दिल्ली – जागतिक जैवइंधन दिनानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे हरियाणातील पानिपत इथला 2 इथेनॉल संयंत्र राष्ट्राला समर्पित केले. या संयंत्रामुळे दिल्ली, हरियाणा आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामधील प्रदूषण कमी होईल, असे ते म्हणाले.
निसर्गाची पूजा करणाऱ्या आपल्यासारख्या देशात जैवइंधन हा निसर्गाच्या संरक्षणासाठी पर्याय आहे. हरियाणात तांदूळ आणि गहू मुबलक प्रमाणात पिकवले जातात. तिथल्या शेतकऱ्यांना पेंढा किंवा पिकांच्या कापणीनंतर राहिलेले पिकांचे अवशेष न जाळता जैव-इंधन प्रकल्प त्यांची विल्हेवाट लावू शकेल, यामुळे खुंटे जाळल्यामुळे प्रदुषण होणार नाही. खुंट कापणे आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. शेतकऱ्यांसाठी ओझे आणि चिंतेचे कारण बनलेला पेंढा त्यांच्यासाठी अतिरिक्त उत्पन्नाचे साधन होईल. तसेच देशाला पर्यायी इंधनही मिळेल, असे पंतप्रधान म्हणाले. देशाच्या विविध भागात असे प्रकल्प निर्माण होत असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला.
राजकीय स्वार्थासाठी शॉर्टकटचा अवलंब करून समस्या टाळण्याकडे कल असणारे लोक कधीच प्रश्न कायमस्वरूपी सोडवू शकत नाहीत. ‘पराली’ किंवा पिकांच्या अवशेषासाठी कृषी उत्पादक संघटनांना आधुनिक यंत्रांवर 80 टक्क्यांपर्यंत अनुदान देऊन साहाय्य दिले जात आहे आणि आता हा आधुनिक प्रकल्प या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा ठरेल. पेंढा जाळण्याच्या सक्तीमुळे बदनाम झालेल्या शेतकऱ्यांना आता जैवइंधन निर्मितीत त्यांनी दिलेल्या योगदानामुळे आणि राष्ट्र उभारणीतील त्यांच्या योगदानाचा अभिमान वाटेल, असे पंतप्रधान म्हणाले. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून पंतप्रधानांनी गोबरधन योजनेचाही उल्लेख केला.
देशाच्या समस्यांवर कायमस्वरूपी आणि चिरस्थायी उपाय सुरू ठेवण्याची गरज अधोरेखित करत पंतप्रधानांनी नवीन खत प्रकल्प, नॅनो खते, खाद्यतेलासाठी नवीन मोहिमांबद्दलही माहिती दिली. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे गेल्या 7-8 वर्षांत देशाचे सुमारे 50 हजार कोटी रुपये परदेशात जाण्यापासून वाचले आहेत आणि तेवढीच रक्कम इथेनॉल मिश्रणामुळे आपल्या देशातील शेतकर्यांना मिळाली आहे, याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. 8 वर्षांपूर्वीपर्यंत देशात केवळ 40 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन होते; आता हे उत्पादन सुमारे 400 कोटी लिटर आहे, अशी माहिती त्यांनी दिली.