पळसदेव, (प्रतिनिधी) – इंदापूर तहसील कार्यालयासमोर पाच कामगारांचे गेल्या २६ दिवसांपासून विविध मागण्यासाठी आमरण उपोषण सुरू आहे. बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी येथील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार आपल्या हक्कासाठी दि. २४ जानेवारीपासून तहसील कार्यालयाबाहेर आमरण उपोषणाला बसलेले आहेत.
मात्र, तरी देखील सुस्त झालेले कंपनी प्रशासन या बाबत कुठलीही कारवाही करण्यास तयार नाही. सध्या उपोषणकर्ते कामगार यांची प्रकृती खालावलेली आहे व त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे अॅड. पांडूरंग जगताप यांनी दिली.
या बाबत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अॅड. पांडूरंग जगताप यांनी कामगार प्रश्नाबाबत माथाडी बोर्डाचे सुजित शिर्के, सहाय्यक कामगार आयुक्त चोबे, पुणे माथाडी मंडळाचे निरीक्षक राजेश मते, बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे जनरल मॅनेजर आनंद कामोजी व एच आर मॅनेजर संग्रामसिंह गायकवाड यांच्याकडे कामगारांच्या प्रश्नांबाबत पाठपुरावा केला आहे.
मात्र, संबंधित अधिकारी या कामगारांच्या प्रश्नांबाबत जाणीवपूर्वक वेळकाढूपणा करत आहेत. यांनी संगनमत करून सदर कामगारांना न्याय मिळू नये, यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप पांडूरंग जगताप यांनी केला.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही माथाडी बोर्ड, बिल्ट कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दखल घेत नाहीत. तरी माथाडी बोर्डाने गोरगरीब कामगारांना तात्काळ नियुक्ती पत्र देऊन बिल्ट कंपनीने या कामगारांना माथाडी कामगार म्हणून हजर करून घ्यावे व सध्या उपोषणकर्ते कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यास संपूर्णतः सहाय्यक कामगार आयुक्त पुणे,बिल्ट ग्राफिक पेपर कंपनीचे जनरल मॅनेजर यांची जबाबदारी राहील, अस पत्र मराठा महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे .