जिल्हाबंदी असताना नगरिक येतातच कसे ?
एकीकडे करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ठोस उपाययोजना सुुरु असताना दुसरीकडे मात्र बाधीत क्षेत्रातून शहरात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे. मुळात जिल्ह्यच्या सीमा सील आहेत. नाक्यावर कडक तपासणी यंत्रणा लावण्यात आली आहे. येणाऱ्या,जाणाऱ्या नागरिकांच्या नोंदी घेतल्या जात आहेत. बाधीत क्षेत्रातून आलेल्या नागरिकांना प्रवेश दिलाच कसा जातो असा प्रश्न उपस्थीत केला जात आहे.
नेवासा -करोना हॉटस्पॉट बनलेल्या पुणे जिल्ह्यातून राज्यातील व परराज्यातील कामगार आपल्या गावी जाण्यासाठी नगर-औरंगाबाद महामार्गाने नेवासा तालुक्यातून वाटचाल करत आहेत. परंतु दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर पोलिसांकडून त्यांना रोखण्यात येत आहे, त्यामुळे काहीजण पोलिसांना गुंगारा देऊन सीमा ओलांडतात तर अनेकजण अडकून पडल्याने तालुक्यात चोररस्त्यांचा शोध घेत फिरत आहेत.
दरम्यानच्या काळात त्यांचा तालुक्यातील नागरिकांशी संपर्क येत आहे. बाधित जिल्हा पार करून आलेल्या या कामगार, मजुरांचा तालुक्यात वावर वाढल्याने करोना संसर्गाचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेऊन या कामगारांना जाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पुणे जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले मध्यप्रदेश, बिहार, उत्तरप्रदेश या परराज्यातील तर जालना, परभणी, नांदेड, जळगाव, अमरावती, हिंगोली या राज्यातील नागरिकांनी गावाकडे जाण्यासाठी रस्ता धरला. त्यांच्यासोबत मुली, गरोदर महिला, लहान मुले यांचाही समावेश आहे.
रेल्वे, बससेवा बंद असल्याने पायीच गावाकडे जाण्याची वेळ त्यांच्यावर अली. ना हाताला काम ना खायला अन्न त्यामुळे या मजुरांना गावाकडे जाण्याशिवाय मार्ग राहिला नाही. अखेर त्यांनी पायी अथवा सायकलवर प्रवास करत पुणे जिल्ह्याच्या बाधीत क्षेत्रातून आड मार्गाने छुप्या रस्त्यांचा वापर करत अहमदनगर जिल्ह्यात अवैध प्रवेश मिळवला आहे. अहमदनगर- औरंगाबाद या महामार्गावरून जात असताना दोन्ही जिल्ह्याच्या सीमेवर नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम (कायगाव) येथे पोलिसांनी नाकेबंदी करत अखेर त्यांना रोखले .
तरीही पोलिसांना गुंगारा देऊन काही छुप्या मार्गाने जीव धोक्यात घालून सीमा ओलांडून जातात. काही सायकलस्वारांनी घोगरगावमार्गे वैजापूर तालुक्यात प्रवेश केला तर काहींना नेवासा तालुक्यात माघारी फिरणे भाग पडले. यावर तहसीलदार सुराणा यांनी उपाययोजना करत महामार्गावरून जात असलेल्या लोकांना प्रशासनामार्फत निवारागृह उपलब्ध करून दिली. परतीचा प्रवास करणाऱ्या कामगारांकडून कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. त्यांची व कुटूंबाची कोणतीही आरोग्य तपासणी झालेली नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर कामगारांना गावी पाठवण्याची व्यवस्था
तालुक्यात तीन ठिकाणी निवारागृह करण्यात आले आहेत. यात राज्यातील व परराज्यातील कामगारासाठी थांबण्याची व्यवस्था केली आहे. याठिकाणी अद्यापपर्यंत 127 जण थांबले आहेत . याबाबत जिल्हाधिकाऱ्याकडे माहिती पाठवली असून त्यांचे आदेशानुसार पुढील कार्यवाही होणार आहे.
रुपेश सुराणा तहसीलदार, नेवासा