बाजार समित्या बंद असल्याने शेती माल पडून
शेतीपूरक व्यवसायांसह, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील व्यवसायही डबघाईला
पुणे – आंबेगाव तालुका करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांकडून अथवा गाव पातळीवरील बाजार देखील बंद असल्याने उत्पादित मालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांवर हताश होण्याची वेळ आली आहे.
पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यात करोनाचे रुग्ण आढळले असले तरी आंबेगाव तालुका येथील प्रशानसनाच्या जागरूकतेमुळे करोनापासून अजून तरी दूरच असला तरी लॉकडाऊनचा प्रभाव येथील अर्थकारणावर मोठा झालेला दिसून येत आहे.
आंबेगाव तालुका मुबलक पाण्यामुळे शेतीप्रधान तालुका म्हणून ओळखला जातो, त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कायमच शेतीमालाची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होत असते. मात्र, तालुक्यात सध्या करोना रुग्ण नसला तरी लॉकडाऊनमुळे तालुक्यातील अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. बाजार समितीचे सर्व व्यवहार थंडावले आहेत.
भाजीपाला, फळे, धान्य यांना उठाव नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. आंबेगाव तालुक्यातून प्रामुख्याने पणे-मुंबई या ठिकाणी भाजीपाल्यासह फळे पाठवली जातात; पण बाजार समितीच बंद असल्याने कोणताच माल बाहेर पाठवणे शक्य होत नसल्याने हा माल शेतातच कुजून जात आहे. काही ठिकाणी त्याचा जनावरांसाठी चारा म्हणूनही उपयोग केला जात आहे.
या भागात शेतीपूरक अनेक व्यवसाय केले जातात. त्यात दुग्ध व्यवसाय, शेती अवजारांचे उद्योग, तरकारी पिकांच्या नर्सरी आदी प्रमुख व्यवसाय आहेत; पण करोनाच्या संकटामुळे हे व्यवसायही संकटात सापडले आहेत. त्यामुळे तालुक्याची अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे.