पुणे – “आपल्या मातापित्याचे संस्कार, शिकवण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. सुषमा व संजय चोरडिया यांनी समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम आणि सामाजिक जाणिवेतून उभारलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी, दिशादर्शक व कौतुकास्पद आहे,” असे मत प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल मणियार यांनी केले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शकुंतला व शांतीलाल कोठारी दाम्पत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. रतनबाई व बन्सीलाल चोरडिया यांच्या स्मरणार्थ जैन समाजातील उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. यावेळी जैन समाजातील दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.
कांतीलाल मुनोत यांना ‘समाज शिरोमणी’, सुरेखा कटारिया यांना ‘समाजरत्न’, प्रफुल कोठारी यांना ‘समाजभूषण व मानवसेवा’, साधना ललवाणी यांना ‘मानवसेवा’, संतोष चोरडिया यांना ‘मानवसेवा व आयकॉन ऑफ राजस्थान’, तर अक्षय जैन आणि रुचिरा मणियार यांना ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
‘सूर्यदत्त’च्या बावधन कॅम्पसमधील बन्सीरत्न सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, माईंड ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, स्नेहल चोरडिया, प्रशांत पितालिया आदी उपस्थित होते.
विठ्ठल मणियार म्हणाले, “चोरडिया परिवाराचे शिक्षण व सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. नाना पेठेत मध्यमवर्गीय कुटुंबात आनंदात वावरणाऱ्या चोरडिया यांनी चांगल्या पदाची नोकरी सोडून पिढी घडविण्याचे काम हाती घेतले आहे. व्यावसायिक संस्था न करता अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या त्यांनी घडवल्या. पद्म पुरस्कार मिळावा नाना पेठेचे भूषण असेल.”
आचार्य लोकेश मुनीजी यांनी आशीर्वादपर मार्गदर्शन केले. आपल्या कार्यातून समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या या महानुभूतींना सन्मानित करून डॉ. संजय चोरडिया नव्या पिढीसमोर आदर्श निर्माण करत आहेत. या व्यक्तिमत्त्वांच्या कार्यातून प्रेरणा घेत आपण राष्ट्रहिताचे कार्य करावे, असे त्यांनी नमूद केले.
नमिता कोहोक म्हणाल्या, “जोखमीशिवाय यश मिळत नाही, यावर माझा विश्वास आहे. जेव्हा परिस्थिती परीक्षा घेते तेंव्हाच जिद्द निर्माण होते, याचा प्रत्यय अनेकदा आला आहे. आपण कसे वागतो हे लोक लक्षात ठेवतात. बोलणे गोड असावे. या स्पर्धेत आम्ही सर्वच कॅन्सर पीडित होतो. प्रत्येकीनेच आपल्या शाररिक, मानसिक अडचणींशी झगडा करत यश मिळविले आहे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी प्रास्ताविकात पुरस्काराची माहिती दिली. सामाजिक व धार्मिक कार्यातून ज्यांनी आम्हाला घडवले त्या माता-पित्याच्या स्मरणार्थ हे पुरस्कार दिले जातात. त्यांनी दिलेला संस्कार, शिकवण पुढील पिढीला देण्याच्या उद्देशाने, राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देऊ शकणारे युवक घडविण्यासाठी सूर्यदत्त शिक्षण संस्था नेहमीच अग्रस्थानी राहील, असे त्यांनी सांगितले.
दत्ता कोहिनकर म्हणाले, “आई वडिलांचे संस्कार, त्याग, समर्पण यातून आपली जडणघडण होते. सत्कर्माचा साठा, निस्वार्थी कार्य आणि विधायक विचार आपल्याला यशाकडे घेऊन जातात. पाठीवर पडलेली कौतुकाची थाप आणखी जोमाने काम करण्याची प्रेरणा देते.”
प्रफुल कोठारी म्हणाले की, मातापित्यांच्या संस्कारातुन आम्ही घडलो. त्यांच्या शिकवणीतून समाजाप्रती काम उभारले. डायलिसिस सुविधा, डायग्नोस्टिक सेंटर सुरू करून आरोग्य क्षेत्रासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे.
संतोष चोरडिया म्हणाले, “कलेच्या माध्यमातून दिव्यांग, कॅन्सर पीडित, अनाथ व इतर पीडितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न करतो. आज या कार्याची दखल घेऊन माझा केलेला सन्मान प्रेरणा देणारा आहे.”
आईचे संस्कार, शिकवण घेऊन वाटचाल करत आहे. सतत नाविन्याचा ध्यास घेऊन युवकांच्या कल्याणासाठी उपक्रम राबवले पाहिजेत, असे अक्षय जैन यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
साधना ललवाणी म्हणाल्या, “मानवसेवा हीच ईश्वरसेवा आहे. आपण एखादे चांगले काम हाती घेतले आणि मानवतेच्या भावनेतून काम केले तर त्याला अनेकांची साथ मिळते.” प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.