मुंबई – देशात ईडी, सीबीआय, एनआयए अशा केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचे काम सुरु आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली, डीएमके नेत्यांच्या घरी छापेमारी झाली, उत्तर प्रदेशमध्येही हेच सुरु आहे. पण महाराष्ट्र राज्यावर कितीही दवाब टाकला तरीही ते झुकत नाही म्हणून भाजप वेगवेगळे डाव आखत आहे.
खा. संजय राऊत, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निकटवर्तीयांवर कारवाईच्या माध्यमातून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी शंका नवाब मलिक यांनी उपस्थित केली.
मात्र सत्तेचा कितीही दुरुपयोग केला तरी तीनही पक्षातील कोणताही नेता या दबावाला घाबरणार नाही. देशात सुरु असलेल्या निवडणुकांच्या माध्यमातून परिस्थिती समोर येईलच आणि जास्त काळ हा यंत्रणांचा गैरवापर चालणार नाही, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला.