शारजा – महिलांच्या आयपीएल स्पर्धेत दोन वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या सुपरनोव्हाजला यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साकार करण्याची नामी संधी आहे. आज या स्पर्धेत त्यांचा ट्रेलब्लेझर्सशी महत्त्वपूर्ण सामना होत आहे.
भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सविरुद्ध निराळीच रणनिती आखली असून त्यात प्रतिस्पर्धी फलंदाजांना एकेरी व दुहेरी धावांपासून रोखण्यावर त्यांचा भर राहणार आहे. या धावा रोखण्यात त्यांना यश मिळाले तरच त्यांच्या फलंदाज धोका पत्करून मोठे फटके मारण्यासाठी उद्युक्त होतील व तेव्हा त्यांना बाद करण्याची संधीही मिळेल, अशी त्यांची योजना आहे.
अर्थात ट्रेलब्लेझर्सच्या दीप्ती शर्मा व सोफी एकेलस्टोन या अष्टपैलू खेळाडूंवर वर्चस्व राखण्यासाठी त्यांची योजना प्रत्यक्ष मैदानावर कितपत यशस्वी होणार हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
हरमनपप्रीतने गेल्या दोन मोसमांपासून आपले नेतृत्वगुण सिद्ध केले आहे. तिच्याच नेतृत्वाखाली यंदा भारताने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली होती. त्यामुळे तिच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज संघाचे पारडे या सामन्यात जड राहण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या संघात जेमिमा रॉड्रिग्ज, पूनम यादव, राधा यादव या भरात असलेल्या खेळाडूंचा समावेश आहे. तसेच सध्याच्या काळातील सर्वात आक्रमक खेळाडू असलेली श्रीलंकेची चामरी अटापटूचा समावेश असल्याने त्यांना मधल्या फळीत आक्रमक फलंदाज असल्याने मोठी धावसंख्या उभारण्याची अपेक्षा राहणार आहे.
सामन्यांची संख्या वाढावी….
गेल्या तीन वर्षांपासून महिलांच्या या मिनी आयपीएल स्पर्धा होत आहेत. स्पर्धेत सुपरनोव्हाजने संपूर्ण वर्चस्व राखले आहे. मात्र, येत्या काळात या स्पर्धेच्या आराखड्यात वाढ व्हावी व या स्पर्धेतील संघांची व सामन्यांचीही संख्या वाढावी, अशी अपेक्षा या स्पर्धेतील तिनही संघांच्या कर्णधारांनी व्यक्त केली आहे.
दुसरीकडे भारताच्या महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली ट्रेलब्लेझर्स संघ यंदा विजेतेपद मिळवण्याच्याच उद्देशाने सहभागी होत आहे. मानधनासह पूनम राऊत, झुलन गोस्वामी या अत्यंत अनुभवी खेळाडूूंमुळे त्यांची गोलंदाजी देखील भक्कम आहे. तसेच दीप्ती शर्मा व सोफी एकेलस्टोन या अष्टपैलू खेळाडूंमुळे त्यांच्या फलंदाजीला खोलीही मिळालेली आहे. या दोघींनी डेथ ओव्हर्समध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली गुणवत्ता सिद्ध केल्यामुळे सुपरनोव्हाजच्या गोलंदाजांना त्यांना रोखण्यात यश येते का यातच त्यांच्या विजयाची संधी दडलेली आहे.
करोनाचा धोका जगभरात पसरण्यापूर्वी झालेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत बारताच्या महिला संघाने नेत्रदीपक कामगिरी केली होती. तसेच आता करोनाचा धोका काही देशांत कमी झाल्याचे दिसत असल्याने येत्या दोन महिन्यांत जागतिक पातळीवरील महिलांच्या स्पर्धाही लवकरच आयोजित केल्या जाण्याची शक्यता असल्याने या स्पर्धेत त्यांना सामने खेळण्याचा सराव मिळणार असल्याचे समाधानही मानधना व हरमनप्रीतने व्यक्त केला आहे.