टाकवे बुद्रुक – गेल्या आठ दिवसापूर्वी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे आंदर मावळातील सत्तर ते पंच्याहत्तर विजेचे खांब पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा पूर्णपणे विस्कळित झाला आहे. गेल्या सात दिवसांपासून वीजपुरवठा खंडित असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
वीज नसल्याचे घरगुती पाणीपुरवठा ठप्प असल्यामुळे कपडे धुवण्यासाठी तसेच घरगुती वापरासाठी विहिरीतून तसेच धरण, नदीवरून पाणी घेऊन येण्यासाठी महिलांना मोठी पायपीट करावी लागत असल्याने महिला वर्गाला मोठ्या संकटाचा सामना सध्या करावा लागत आहे. पीठगीरण बंद असल्याने दळणासाठी टाकवे या ठिकाणी याव लागत आहे. सध्या आंदर मावळातील टाकवे बुद्रुक, फळणे वगळता वडेश्वर, नागाथली, वहानगाव, कोडीवडे, भोयरे, कशाळ, खांडी, सावळा यासह पस्तीस गावे अद्यापही
आंधारातच आहेत.
टाकवे, फळणेपर्यंत वीजपुरवठा सुरळीत झाला. आंदर मावळातील अन्य भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी पडलेले खांब उभे करून तारा ओढण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे. काम पूर्ण होताच वीजपुरवठा सुरू होईल.
– शाम दिवटे, अभियंता, महावितरण