– वंदना बर्वे
नवी दिल्ली – करोना विषाणूमुळे युरोपियन देशांमध्ये अक्षरश: हाहाकार माजला आहे. परिस्थिती एवढी हाताबाहेर गेली की इटली आणि स्पेनमध्ये लष्कराच्या मदतीने मृतदेहांची विल्हेवाट लावली गेली. अशात, युरोपियन देशात अडकलेल्या हजारो भारतीयांना मायदेशी पाठविण्याचं काम महाराष्ट्राची कन्या आणि जर्मनीतील कॉंसील जनरल प्रतिभा पारकर यांनी केले आहे. मुंबईच्या प्रतिभा पारकर आता अंगोलाच्या राजदूत झाल्या आहेत, हे येथे उल्लेखनीय आहे.
जर्मनीत कॉंसील जनरल असताना प्रतिभा पारकर यांनी केंद्र सरकारच्या “वंदे भारत’मोहिमेच्या माध्यमातून जवळपास एक हजार लोकांना भारतात पाठविण्याचे काम केले होते. यात गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, नोकरी गमाविणारा वर्ग, विद्यार्थी आणि पर्यटक आदींचा समावेश होता.
करोना विषाणूने मार्च महिन्यात अख्ख्या इटली आणि स्पेन या दोन देशांना आपल्या मगरमिठीत घेतले होते. श्वास घेतानाही करोनाची भीती वाटत होती. अशा भीषण परिस्थितीत युरोपमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी पाठविण्याचे आव्हान जर्मन दुतावासापुढे निर्माण झाले. करोनाची लागण होणार नाही याची खास खबरदारी घ्यायची होती. लोकांची आकडेवारी एकत्रीत करण्यापासून ते भारतात पाठविण्यापर्यंतची व्यवस्था करणे म्हणजे तारेवरची कसरत होती. अर्थातच, परराष्ट्र आणि नागरी उड्डाण मंत्रालय, जर्मनीतील दुतावास, विविध राज्यांचे समन्वयक आणि एअर इंडियाची टीम या कामात अहोरात्र लागली होती, असे सांगायला पारकर विसरल्या नाहीत.
युरोपियन देशांतील ब्रिटन, इटली, स्पेन, जर्मनी आणि रशीयात हजारो जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. इटली आणि स्पेनमध्ये लष्कराची मदतीने शव उचलले जात असल्याचे अख्ख्या जगाने बघितले. यावरून परिस्थितीची भीषणता लक्षात यावी.
आकडेवारीनुसार, युरोपियन देशांमध्ये 15 लाख भारतीय वास्तव्याला आहेत. ब्रिटन, इटली, जर्मनी, नेदरलॅंड, फ्रांस, रशिया, स्पेन या देशांमध्ये ही संख्या जास्त आहे. नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, स्वीडन, बेल्जिअम, ग्रीस, डेन्मार्क, युक्रेन, पोलंड या ठिकाणी कमी आहे. स्लोवाकिया, लिथुनिया, बल्गेरिया या देशांमध्ये ही संख्या शंभराच्या आसपास आहे.
प्रतिभा पारकर यांनी जर्मनीहून जवळपास एक हजार नागरिकांना जर्मनीहून (फ्रॅंकफर्ट) भारतात पाठविले आहे. मात्र, ही बाब वरवर दिसते तेवढी सोपी नाही. यामागे तारेवरची मोठी कसरत आहे. इच्छुकांचा डाटा गोळा करण्यापासून ते विमान भारतात लॅंड होईपर्यंत सर्व गोष्टींची व्यवस्था करणे आवश्यक होते. कारण, कोणत्याही परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्यायची होती.
युरोपमध्ये अडकलेल्यांना फ्रॅंकफर्टहूनच भारतात पाठविलं जात आहे. लोकांची यादी जमविण्यासाठी एक लिंक तयार केली आणि त्यावर नोंदणी करण्यास सांगण्यात आलं. आतापर्यंत तीन हजार लोकांनी नोंदणी केली आहे. यात महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, पर्यटक, बेरोजगार आदींचा समावेश होता.
तीन हजार लोकांना एकाचवेळी पाठविणे शक्य नव्हतं. म्हणून पारकर यांनी आधी प्राधान्यक्रम ठरविला. गर्भवती महिला, आजारी लोक, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्यात आलं. ही यादी एअर इंडियाला पाठविली जायची. एअर इंडियाने तिकीट दिलं की लोकांना त्याची माहिती दिली जायची. यानंतर खऱ्या अर्थाने प्रवासाची सुरवात होत होती. एअर इंडियाने विमान सेवा सुरू केली असली तरी तिकीट सर्वांसाठी उपलब्ध नव्हते.
प्रवासाच्या दिवशी सर्वांना फ्रॅंकफर्ट विमानतळावर बोलावलं जायचं. येथेच थर्मल स्क्रीनिंग व्हायची. सर्वांकडून क्वारंटाईन होण्यासाठी प्रतिज्ञापत्र घेतलं जात होते. ही सर्व जुळवाजुळव करणे अवघड नसली तरी सोपी सुध्दा नव्हती. कारण, प्रत्येक जण त्रस्त होता. घाबरला होता. नोकरी गेल्यामुळे कुणाकडे पैसे नव्हते तर कुणाचे आईवडील आजारी होते. काही लोकांची तर मनोचिकित्सा करावी लागली.
काही लोकांना अमेरिकेहून भारतात जायचे होते. मात्र, पोहचले फ्रॅंकफर्टला. आपले लुफ्तांसाचे विमान रद्द झाले याची त्यांना माहितीच नव्हती. थोडक्यात एवढेच की, प्रत्येकाची कथा मन हेलावून टाकणारी होती. मात्र, यासर्व परिस्थितीवर मात करण्यात जर्मनीतील भारतीय डॉक्टर आणि मराठी कट्टा यांचं मोलाचं सहकार्य मिळाले. सर्वांच्या मदतीने हे धनुष लीलया पेलले गेले ही समाधानाची बाब होती, असे प्रतिभा पारकर हळव्या होवून सांगत होत्या.