पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या वतीने गुरुवारपासून (दि. 19) महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर पाणीप्रश्नावर 12 महिलांनी उपोषण सुरू केले होते. सुनील केदार यांच्या उपस्थितीत या महिलांनी आज (दि. 20) उपोषण स्थगित केले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे, पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम, कॉंग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सायली नढे, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील, पुणे शहर जिल्हा कॉंग्रेसच्या महिला अध्यक्ष पूजा आनंद, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या महिला उपाध्यक्ष संगीता तिवारी आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी सकाळपासून मनपाच्या प्रवेशद्वारासमोर लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले होते. या उपोषणात माजी नगरसेविका निर्मला कदम, पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेसच्या छायावती देसले, डॉ. मनीषा गरुड, रिटा फर्नांडिस, नंदा तुळसे, निर्मला खैरे, वैशाली शिंदे, प्रियांका कदम, दिपाली भालेकर, सोनू दमवाणी, आशा भोसले यांनी सहभाग घेतला होता.
आंदोलनस्थळी महिलांना मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेप्रमाणे पदाधिकारी, अधिकारी ही लोकशाहीची दोन चाके सुरळीत चालल्यास सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील आणि लोककल्याणाची कामे होतील.
मंत्री येताच आयुक्तही आले
पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार उपोषणस्थळी दाखल होताच पिंपरी-चिंचवड मनपाचे आयुक्त राजेश पाटील तेथे येऊन त्यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले. उपोषण समाप्त झाल्यानंतर पालिका प्रशासन भवनात झालेल्या बैठकीत राजेश पाटील यांनी आश्वासन दिले की, आगामी दीड महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होईल. तसेच टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, याबाबत तपासणी पथक नेमून पुढील आठ दिवसांत त्याचा अहवालदेखील जाहीर
केला जाईल.