सोलापूर: राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी खो-खो स्पर्धेत पुण्याने महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात गतविजेत्या ठाण्याला नमवून विजेतेपदावर नाव कोरले. पुरुषांमध्ये मुंबई उपनगरने विजेतेपदाची हॅटट्रिक साधताना पुण्यावर मात केली.
पुरुष गटातील अंतिम सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांमध्ये 17-17 अशी बरोबरी होती. त्यानंतर झालेल्या अलाहिदा डावातही दोन्ही संघांनी प्रत्येकी सात गुण मिळवले. परंतु उपनगरने पुण्याला लघुत्तम आक्रमणाद्वारे अवघ्या 59 सेकंदांनी पराभूत केले.
महिलांच्या गटातील अंतिम लढतीत पुण्याने गतविजेत्या ठाणे संघावर 11-9 अशी दोन गुणांनी मात केली. सलग पाच वर्षे विजेतेपद मिळवल्यानंतर प्रथमच ठाण्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुण्याकडून काजल भोर आणि भाग्यश्री जाधव यांनी अष्टपैलू कामगिरी केली.
उपनगरच्या ऋषिकेश मुर्चावडेने स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूच्या राजे संभाजी पुरस्कारावर मोहोर उमटवली, तर महिलांमध्ये पुण्याची काजल भोर राणी अहिल्या पुरस्काराची मानकरी ठरली. पुण्याचा अक्षय गणपुले आणि ठाण्याची रेश्मा राठोड यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिलांच्या गटात सर्वोत्तम संरक्षकाचा पुरस्कार मिळवला. पुण्याचेच सुयश गरगटे आणि प्रियंका इंगळे सर्वोत्तम आक्रमक खेळाडू ठरले.