पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) :– प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखऱ धवनच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना झालेल्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी कसून सराव केला. या दोन संघात आज (शुक्रवार) तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रंगणार असून याही मालिकेत विजयी सलामीसाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.
वेस्ट इंडीज विरुद्ध भारत
वेळ : संध्याकाळी 7 वाजल्यापासून
ठीकाण : पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद)
थेट प्रक्षेपण : डीडी स्पोर्टस 1
आजवर भारतीय संघाला वेस्ट इंडीजमध्ये सातत्याने मालिका जिंकण्यात यश आलेले नसल्याने यंदा त्यांना मिळालेल्या संधीचा लाभ घेणार का असाच प्रश्न निर्माण झाला आहे. नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहलीसह अन्य काही खेळाडूंनी या मालिकेतून विश्रांती घेतली आहे. त्यांच्या जागी संघा स्थान मिळालेल्या नवोदितांना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी आहे.
ऋतूराज गायकवाड, शुभमन गिल, संजू सॅमसन, इशान किशन यांना सातत्याने मिळालेल्या संधीचा लाभ घेता आलेला नाही मात्र, ही मालिका त्याला अपवाद ठरली तर त्यांचे मर्यादीत षटकांच्या सामन्यांसाठी भारतीय संघातील स्थान पक्के रता येणार आहे. तसेच सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, श्रेयस अय्यर हे भरात असले तरीही वेस्ट इंडीजमधील लहरी हवामानात स्विंग गोलंदाजीसमोर त्यांचा कस लागणार आहे.
संघाचे नेतृत्व धवन करत असला तरीही त्याची वैयक्तिक कामगिरी पारशी चांगली झालेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील चुका त्याला लवकरात लवकर सुधाराव्या लागणार आहेत. गोलंदाजीत मंहमद सिराज, अर्शदीप सिंग, आवेश खान व प्रसिद्ध कृष्णा असे चांगले गोलंदाज वेस्ट इंडीजवर वर्चस्व राखतील अशी अपेक्षा आहे.
वेस्ट इंडीज संघाला मायदेशात खेळण्याचा फायदा मिलणार असला तरीही त्यांचे गोलंदाज सध्या भरात नाहीत हेच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेतून दिसून आले आहे. किमो पॉल, जेसन होल्डर, काईल मेयर्स यांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. तसेच फलंदाजीतही होल्डर त्यांच्यासाठी बोनस ठरु शकतो. साई होप. शेमार ब्रुक्स व रॉमन पॉवेल हे भरात असून त्यांना रोखण्याचे भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान राहणार आहे.
हुडा निर्णायक ठरेल
यंदाच्या मोसमात झालेल्या आयपीएल स्पर्धेपासून सातत्याने धावा करत असलेला दीपक हुडा वेस्ट इंडिजसाठी धोकादायक ठरू शकतो तर भारतासाठी या मालिकेतील ट्रम्पकार्ड ठरु शकतो. हुडाने देशांतर्गत स्पर्धेसह आयपीएल व त्यानंतर झालेल्या मालिकांमध्ये थेट विराट कोहलीच्याच संघातील जागेवर दावा केला होता, त्यामुळे त्याची कामगिरी कशी होते यावर भारतीय संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.