वेस्ट इंडिजविरूध्दच्या दुस-या टी-20 सामन्यात टॉस जिंंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने तिलक वर्माच्या शानदार अर्धशतकी खेळीच्या जोरावर 20 षटकात 7 विकेट गमावून 152 धावा केल्या असून वेस्ट इंडिजसमोर 153 धावांचे लक्ष्य ठेवले आहे.
पहिल्या सामन्यात टीम इंडियाला 150 धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. अशा स्थितीत वेस्ट इंडिजसाठीही हे लक्ष्य सोपे नसेल. गयानाच्या संथ खेळपट्टीवर धावा काढणे सोपे नाही आणि भारतीय संघातील तीन फिरकी गोलंदाज विंडीजला अडचणीत आणू शकतात.
या सामन्यात भारताकडून तिलक वर्माने 41 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने सर्वाधिक 51 धावा केल्या. इशान किशनने 27 आणि हार्दिक पंड्याने 24 धावांचे योगदान दिले. अक्षर पटेलने 14 धावा केल्या. या चौघांव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही. सूर्यकुमार यादव एक धावेवर तर संजू सॅमसन 7 धावा काढून बाद झाला.
वेस्ट इंडिजकडून गोलंदाजीत अल्जारी जोशेफ,अकील हुसैन आणि रोमारियो शेफर्ड यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.