हजारो रसिकांच्या साक्षीने आणि भारावलेल्या सुरेल वातावरणात “सवाई’ची सांगता
पुणे – मनावर अधिराज्य करणारे ख्यातनाम कलाकारांचे सुश्राव्य सादरीकरण… रसिकांना खिळवून ठेवणारी साथसंगत… रसिकांनी भरभरून दिलेली दाद…टाळ्यांचा कडकडाट… डोलणाऱ्या माना… वन्स मोअर… स्टॅंडिंग ओव्हेशन आणि सुट्टीचे औचित्य साधत वाढत जाणारी रसिकांची गर्दी… अशा वातावरणात अभूतपूर्व पर्वणी असणाऱ्या “सवाई’चा समारोप रविवारी झाला. संगीतप्रेमी कलाकार आणि रसिकांचे जणू तीर्थस्थान असणाऱ्या सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दमदार सुरुवातीप्रमाणे सांगताही हजारो रसिकांच्या साक्षीने आणि भारावलेल्या सुरेल वातावरणात झाली.
रविवारी महोत्सवाची सुरुवात ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका वीणा सहस्रबुद्धे यांचे शिष्य अतुल खांडेकर यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग शुद्ध सारंगने आपल्या गायनाची सुरुवात केली. त्यांनी विलंबित एक तालातील “आइये सब मिल देवो मुबारक बतिया…’ ही रचना सादर केली. त्यानंतर “अब मोरी बात…’ ही रचना आणि “दीर दीर दीर तानोम…’ हा तराणा पेश केला. मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेला अभंग “अवघाची संसार सुखाचा करीन…’ या अभंगाने त्यांनी आपल्या मैफलीचा समारोप केला. त्यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), निरंजन लेले (हार्मोनियम), भक्ति खांडेकर, वालीराज लिमये आणि सुधांशू मणेरीकर (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
त्यानंतर पंडीत उल्हास कशाळकर यांच्या शिष्या रुचिरा केदार यांचे गायन झाले. त्यांनी राग गौडसारंगने गायनाची सुरुवात केली. “सैया मे तो…’ ही पारंपरिक बंदिश आणि “पिहू पालन लागी मोरी अखिया…’ ही बंदिश त्यांनी सादर केली. त्यानंतर “ए होरी खेलत बिहारी…’ ही रचना आणि तराणा पेश केला. त्यांना मिलिंद कुलकर्णी (हार्मोनियम),
अजिंक्य जोशी (तबला), नित्या शिकारपूर आणि कस्तुरी जोशी (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
सवाई गंधर्व यांचे ज्येष्ठ शिष्य आणि किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित फिरोज दस्तूर यांचे शिष्य चंद्रशेखर वझे यांनी राग भीमपलासने आपल्या गायनाची सुरुवात केली. “अब तो करम करो…’ या रचनेने रागाचा विस्तार केला. त्यानंतर “गोरे मुख सो मोरा मन भावे…’ ही रचना पेश केली. त्यांचे वडील पं. रघुनाथ वझे यांची “जा जा बदरवा जा…’ ही बंदिश त्यांनी राग दुर्गा, अभोगी, बिलसखानी तोडी, शंकरा या चार रागांमध्ये सादर केली. त्यांनी पं. भीमसेन जोशी यांचा “ज्ञानियांचा राजा गुरु महाराज…’ हा अभंग सादर केला. “गोपाल मोरी करुणा क्यू नही आयी…’ या रचनेने त्यांनी मैफलीला विराम दिला. त्यांना ऋग्वेद देशपांडे (तबला), डॉ. चैतन्य कुंटे (हार्मोनियम), मनोज कट्टी, मंदार कुलकर्णी (तानपुरा), माऊली टाकळकर (टाळ) यांनी साथसंगत केली.
प्रसिद्ध सतारवादक नीलाद्रीकुमार यांनी राग सिद्धेंद्रने वादनाची सुरुवात केली. त्यांच्या वादनाला वन्स मोअर देत रसिकांनी दाद दिली. त्यानंतर राग तिलक कामोद आणि नट यांचे मिश्रण असलेला नवा राग त्यांनी पेश केला. त्यांना पंडित विजय घाटे यांनी तबल्यावर साथसंगत केली. शेवटच्या सत्राची सुरुवात पंडित उपेंद्र भट यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग मारुबिहाग मध्ये सुरुवात करून “रसिया आवोना…’ ही रचना सादर केली. त्यानंतर “नैना लागये सो मेंने..’, “कोयलिया बोले चले जात…’ या रचना सादर केल्या. त्यानंतर “रम्य ही स्वर्गाहुनी लंका…’ हे नाट्यपद सादर केले. पु. ल. देशपांडे, गदिमा आणि पं. भीमसेन जोशी या त्रिवेणीची आठवण करून देत “इंद्रायणी काठी…’ हा अभंग सादर केला. त्यांना सचिन पावगी (तबला), कुमार करंदीकर (हार्मोनियम), मनोज भांडवलकर (पखवाज), रमाकांत परांजपे (व्हायोलिन), देवव्रत भातखंडे, तेजस देवडे, धनंजय भाटे, नागेंद्र पांचाळ (तानपुरा आणि गायन साथ) यांनी साथसंगत केली.
पतियाळा घराण्याचे ज्येष्ठ गायक पंडित अजय चक्रवर्ती यांचे गायन झाले. त्यांनी राग भूपालीने गायनाची सुरुवात केली. तर “महादेव देव महेश…’ ही रचना त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना समर्पित केली. त्यांनी “बसों मेरे नैनन में नंदलाल…’या रचनेने समारोप केला. त्यांना सत्यजित तळवलकर (तबला), अजय जोगळेकर (हार्मोनियम), मेहेर परळीकर, अमोद निसाळ (तानपुरा) यांनी साथसंगत केली.
…म्हणून महोत्सवाचा समारोप भैरवीने
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या प्रथेनुसार किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या गायनाने संगीतोत्सवाची सांगता होते. मात्र, यंदा त्यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे गायनसेवा अर्पण करता आली नाही. त्यामुळे किराणा घराण्याचे आणि पं. भीमसेन जोशी यांच्या शिष्य आणि प्रशिष्यांनी सादर केलेल्या भैरवीने महोत्सवाचा समारोप झाला. पं. उपेंद्र भट, पं. राजेंद्र कंदलगावकर, पं. सुधाकर चव्हाण, आनंद भाटे, श्रीनिवास जोशी आणि विराज जोशी या पाच गायक शिष्यांनी “जमुना के तीर…’ ही भैरवी सादर केली. त्यांना भारत कामत (तबला), सुयोग कुंडलगावकर (हार्मोनियम), नामदेव शिंदे, संदीप गुरव (तानपुरा) यांनी साथसंगत केली. तर दरवर्षीप्रमाणे समारोपाची सवाई गंधर्वांच्या आवाजातील “जमूना के तीर’ या भैरवीच्या ध्वनिमुद्रिकेने झाली.