मळवली – “पीएमआरडीए’च्या विकास आराखड्यामध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनीवर विविध प्रकारची आरक्षणे टाकण्यात आली आहेत. याला विरोध दर्शवण्यासाठी सोमवारी कार्ला येथे परिसरातील गावातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी बहुतांशी शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध दर्शविला. खासदार श्रीरंग बारणे व आमदार सुनील शेळके तसेच माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे हे देखील शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत.
पीएमआडीएच्या आराखड्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल, तर खासदार या नात्याने मी आरक्षणाला कडाडून विरोध करेन. विकास व्हायला हवा पण बळीराजाला भकास करून होणारा विकास आम्हाला नको आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या हरकती मुदतीत नोंदवाव्यात, जेणेकरून सुनावणीवेळी समाधानकारक तोडगा काढता येईल. शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे काही कारण नाही, कार्यक्षेत्रातील एकाही शेतकऱ्यावर मी स्वतः आणि शिवसेना कदापि अन्याय होऊ देणार नाही. प्रसंगी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याची वेळ आली तरी माझ्यासह सर्व शिवसेना आपली ताकद बळीराजाच्या पाठीशी उभी राहीन, असे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ठणकावून सांगितले.
मी समितीवर नियुक्त असलो तरी माझे प्राधान्य माझ्या तालुक्यातील बळीराजाला आहे. त्यामुळे या बळीराजाचे मी कदापी नुकसान होऊ देणार नाही. यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या लेखी हरकती मुदतीत दाखल कराव्यात, जेणेकरून सुनावणी वेळी मी याचा पाठपुरावा करून शेतकऱ्यांची बाजू मांडू शकतो. तसेच या आराखड्यात बदल करण्यास शासनाला भाग पाडू शकतो. यासाठी आपण हरकती नोंदवाव्यात मी सदैव तुमच्या पाठीशी नव्हे, तर सोबत राहील, अशी ग्वाही आमदार शेळके यांनी दिली.
माजी राज्यमंत्री संजय बाळा भेगडे यांनी देखील पुणे जिल्ह्यातील पीएमआडीए कार्य क्षेत्रातील शेतकऱ्यांना व नागरिकांना आवाहन केले आहे की सर्वांनी “पीएमआरडीए’च्या प्रस्तावित प्रारूप विकास आराखड्याला तालुक्यातून विरोध दर्शवला जात आहे. नागरिकांना आपल्या हरकती व सूचना मांडण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी वडगाव मावळ येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा व आपल्या हरकती व सूचना 28 ऑगस्टपर्यंत कार्यालयात जमा कराव्यात.
खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके आणि माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे सर्व लोकप्रतिनिधी बळीराज्याच्या पाठीशी असल्याने शेतकरी राजा सुखावला असून, यामुळे शेतकऱ्यांच्या या लढ्याला बळ प्राप्त होणार आहे, असे शेतकरी वर्गाकडून बोलले जात आहे.