कराड -गतवर्षीच्या महापुराचा जबर फटका नदीकाठच्या गावांना बसला. सुदैवाने त्यावेळी कराडमध्ये जीवितहानी झाली नाही; परंतु संभाव्य पूर स्थिती हाताळण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे. कराडमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण नुकतेच झाले. निसर्ग चक्रीवादळाच्या आपत्तीत प्रशासनाने महाबळेश्वर, वाई व जावळी तालुक्यातील काही गावांमध्ये लोकांना आवाहन करण्यासाठी प्रथमच पिनकोड आधारीत वॉर्निंग सिस्टीमचा वापर केला होता. संभाव्य पूर स्थितीत याच प्रणालीचा वापर केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
संभाव्य पूर स्थितीसंदर्भात बुधवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते उपस्थित होत्या. सिंह म्हणाले, गेल्या वर्षी कराड तालुक्यात 1600 टक्के पाऊस झाला. शंभर वर्षानंतर काही मर्यादित काळातही अतिवृष्टी झाली होती. हा पाऊस फक्त कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडला आणि धरणातून पाणी सोडण्यात चुका झाल्या, असे म्हणता येणार नाही.
हा पाऊस अन्य भागातही पडल्याने नद्यांची पाणीपातळी वाढली. धरण व्यवस्थापन प्रथम धरण सुरक्षिततेचा विचार करणार, हे क्रमप्राप्त आहे. ही परिस्थिती लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन संभाव्य पूर परिबाबत उपाययोजना करत आहे. कराड तालुक्यासाठी आधीच चार बोटी देण्यात आल्या आहेत. गटविकास अधिकाऱ्यांची दोन फायबर बोटींची मागणी आहे. त्या बोटीही लवकरच देण्यात येतील. तालुक्यात एकूण सहा बोडी उपलब्ध होणार असल्याने आपत्ती काळात मदतकार्यासाठी फायदा होणार आहे.
महामार्गावर पाणी आल्यानंतर वाहनचालकांची गैरसोय होते. गतवर्षी स्थानिकांनी त्यांना चांगली मदत केली होती. अशी पूर स्थिती उद्भवल्यास प्रशासनाकडून मदत केली जाईल. नदीकाठच्या भागाचे सर्वेक्षण करून धोका संभवणाऱ्या ठिकाणच्या लोकांचे आतापासूनच स्थलांतर करण्यात येत आहे. करोनाच्या काळात जिल्ह्यात सर्वाधिक फटका कराडला बसला आहे. त्यात यंदा पूर स्थिती उद्भवल्यास शहर व नदीकाठच्या भागात पूर रेषेवरील नागरिकांचे पुनर्वसन करताना अडचणी येणार आहेत. स्थलांतरीतांना एकाच खोलीत ठेवता येणार नाही. अशा वेळी सोशल डिस्टन्सिंग पाळणे अवघड होणार आहे. त्यासाठी प्रभावी आराखडा तयार करण्यात येत आहे.