कवठे येमाई, – पाच वर्षे खासदार राहून त्यांनी अनेक वचने दिली; पण एकही पूर्ण केले नाही. सर्वसामान्य नागरिकांची निराशा केली. एकही रुपयाचा निधी आणला नाही. अशांना आता निवडून देणार का? अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळऱाव पाटील यांनी समाचार घेतला. गावगप्पा मारणार्यांना घरी बसविण्याची हीच वेळ असल्याचे सांगत डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला.
कवठे येमाई येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी पूर्वा दिलीप वळसे पाटील, प्रदीप वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, मानसिंगराव पांचूदकर, डॉ. सुभाष पोकळे, मारुतराव शेळके, सुदाम ईचके, अनिल शिंदे, बाळासाहेब बेंडे, भगवान शेळके, बापूसाहेब शिंदे, प्रकाशराव पवार, सविताताई बगाटे आदी उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले की, आता ही देशाची निवडणूक आहे. आपल्या सर्वांचे भवितव्य ठरवणारी आहे. गेल्या वेळी केलेली चूक परत करू नका. संसदेत कोणी किती प्रश्न मांडले याचा हिशोब त्यांनी सांगितला. ते म्हणाले की विद्यमान खासदाराने संसदेत 621 प्रश्न मांडले, मी 1102 प्रश्न मांडले. याचा वेध घेण्याची हीच वेळ आहे.
पोपटराव गावडे म्हणाले की, ”विकासकामांसाठी विकासपुरुष आढळराव पाटील यांना निवडून आणावेच लागेल. विद्यमान खासदार आले आणि गायब झाले. मात्र आढळराव पाटील यांनी जमिनीशी असणारी नाळ केव्हाच तुटू दिली नाही. जमिनीशी नातं असणारा हा नेता आहे. मतदारसंघात भरघोस निधी त्यांनी आणला आहे.
डॉ. सुभाष पोकळे म्हणाले, कवठे येमाई गाव आणि आढळराव यांचे वेगळे नाते आहे. त्यांच्यासाठी आपण ठामपणे मागे आहोत. ज्यांना निधी असूनही वापरता आला नाही, त्यांचे हे काम नव्हे, त्यासाठी आढळराव पाटील यांना पर्याय नाही.
अभिजित बोराटे म्हणाले, सेटवरचा माणूस सेटवर पाठवायची हीच वेळ आहे. त्यांनी केवळ निधी आणण्याचे नाटक केले, म्हणून तर त्यांच्या काळातला 80 टक्के निधी परत गेला; मात्र अनुभवी अशा आढळराव यांनी दीड हजार कोटी रुपयांचा निधी आपल्या भागासाठी आणला आहे. त्यांच्यासाठी आपले मत महत्वपूर्ण आहे.
यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. जेसीबीने फुलांचा वर्षाव करत, आढळराव पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
वळसे पाटील साहेब यांची प्रतिनिधी म्हणून मी इथे आले आहे. साहेबांचे सर्व गोष्टींवर बारीक लक्ष आहे. त्यांचा संदेश घेऊन आलेय. आढळराव पाटील यांचे मोठे काम आहे. आवाका मोठा आहे म्हणूनच उत्तम इंग्रजी माध्यम शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांच्या क्रीडानैपुण्यासाठी क्रिकेट स्टेडियम उभारले आहे. ग्रामीण भागाचा शैक्षणिक कायापालट त्यांनी केला. करोनाच्या कठीण काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा हात दिला. -पूर्वा वळसे पाटील
बैलगाडा शर्यती सुरु व्हाव्यात यासाठी मी 7 वर्षे खर्ची केली आहेत. बैलगाडा शर्यतीसीठी आजपर्यंत तीनदा केसेस अंगावर घेऊन, दोन वेळा बंदी मी उठवली. राज्य सरकारमुळे बंदी उठली. सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठविली. याचे बिनकामाचे श्रेय घेऊन, बंदी मी उठवल्याचा कांगावा विद्यमानांनी करु नये. -शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार शिरुर लोकसभा
मोबाईल टॉर्चच्या उजेडात जल्लोष
आढळराव पाटील यांच्या या निर्धार मेळाव्याला सायंकाळी उशीर झाला तरी मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते. अंधार पडल्यानंतर मोबाईल टॉर्च लावून त्याच्या उजेडात जल्लोष करत, निर्धार मेळाव्याचा माहोल उशीरापर्यंत उत्साहात टिकवून ठेवल्याचे चित्र दिसून आले.