पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – निवडणूक प्रचारावेळी जेव्हा मतदारांना भेटाल, त्या वेळी वादग्रस्त वक्तव्य आणि कृती करणे कृपा करून टाळा. डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर घेऊन फिरा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केले, तसेच चारही लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांचे मताधिक्य वाढवायचे आहे, कमी करायचे नाही. व्यासपीठावरील नेत्यांसह सर्वांनी हे लक्षात ठेवले पाहिजे, असेही पवार यांनी आवर्जून नमूद केले.
महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव यांच्या प्रचारार्थ आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पवारांनी प्रचारादरम्यान पाळायचे संकेत काय आहेत, याविषयी कानपिचक्या दिल्या.
तुमच्या, माझ्या बोलण्याने आपल्या उमेदवारांची मते घटणार नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी आपले वर्तन हे चांगलेच ठेवले पाहिजे. मी देखील दररोज सकाळी उठल्यावर बाहेर पडताना डोक्यावर बर्फ ठेवून बाहेर पडतो. चिडायचे नाही, मोठ्याने बोलायचे नाही, असे ठरवतो, असे ते म्हणाले.
नम्रतेने वागा, महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, परंपरा आहे. आपल्याला सत्तेचा दर्प आहे, हे वागण्यात आणि बोलण्यात दिसणार नाही, यांचे भान कार्यकर्त्यांबरोबरच व्यासपीठावरील व्यक्तींनीही ठेवले पाहिजे, असे पवार यांनी म्हणताच प्रेक्षकांमध्ये हशा पिकला. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उच्च-तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.
लोकसभेची ही निवडणूक म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम आहे. पाच महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तेव्हाही आपल्याला पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर आणायचे आहे. त्यामुळे फ्लेक्सवर फोटो नाही, निरोप नाही, असे कोणतेही कारण सांगू नका. एकदिलाने काम करा. जिल्ह्यातील महायुतीच्या नेत्यांचे वेगवेगळी चिन्हे आहेत. ती मतदारांपर्यंत पोचवा आणि मोदींसाठी मतदान करा, हे मतदारांना सांगा.
सोशल मीडियाचा वापर काळजीपूर्वक करा. विरोधक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतील. त्याला बळी पडू नका. आपण केलेल्या विकासाच्या कामांवर मते मागा. विरोधासाठी विरोध करून विकास होत नाही, ही भूमिका पुणेकरांना पटवून द्यावी लागेल. आपण एकत्र आलो, तर विरोधकांचा टिकाव लागणार नाही, असेही पवार यांनी नमूद केले.
मेळाव्यातील चूकभूल
मेळाव्याच्या ठिकाणी महायुतीतील घटक पक्षांनी तयार केलेली प्रचाराची वेगवेगळी गाणी लावण्यात येत होती. त्यामध्ये अचानक कितीही लावा ईडी-फीडी, पण आमचा दादा आहे रुबाबदार, हे गाणे वाजले. हे लक्षात येताच, ते तत्काळ बंद करण्यात आले.
तसेच भाषणादरम्यान डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून चुकून आढळराव यांच्या चिन्हाचा उल्लेख धनुष्यबाण असा होताच सभागृहात एकच ओरडा झाला आणि घड्याळ आहे अशी आठवण त्यांना करून देण्यात आली.