बारामती (प्रतिनिधी) – शहरालगत असलेल्या मेडद, मळद व बांदलवाडी गावांचा समावेश बारामती शहरात करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. मेडद व मळद गावांचा शहरात समावेश होण्यासाठी ये याचा शासनाकडे प्रस्ताव पाठवा अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना बारामती येथे दिल्या आहेत. त्यामुळे बारामती नगरपरिषदेची पुन्हा हद्दवाढ होईल, असे मानले जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरालगत असलेल्या मळद, मेडद तसेच बांदलवाडी गावांची पाहणी केली. यावेळी गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर, मुख्याधिकारी योगेश कडूसकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर यांच्यासह कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, विश्वास ओहोळ उपस्थित होते.
शहरालगत असलेली ही गावे शहराला कशाप्रकारे जोडता येतील याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी यावेळी चर्चा केली. याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचनादेखील अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. शहरालगतच्या या गावांचा शहरात समावेश व्हावा, अशी नागरिकांची मागणी होती. सामाजिक कार्यकर्ते दिलीप शिंदे यांनीदेखील शनिवारी (दि. 30) याबाबत मागणी केली.
शहरालगत असलेल्या तांदूळवाडी, रुई, जळोची व बारामती ग्रामीण या भागाचा समावेश बारामती नगरपालिकेत यापूर्वी करण्यात आला आहे. आता आणखी तीन गावांचा समावेश शहरात झाल्यानंतर येथील नागरिकांना मूलभूत सुविधा देता येणार आहे असे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, हद्दवाढ क्षेत्रात कायमच मूलभूत सुविधांच्या नावाने कायमच बोंब उठते हा आजवरचा इतिहास आहे त्यामुळे बारामती नगरपरिषदेची हद्द वाढ झाल्यावर परिस्थिती कशी असेल याबाबत नागरिकांना उत्सुकता लागून राहिली आहे.