नागपूर- सगळे लोक तिरंगा फडकवतात, सगळे कार्यक्रम पाहायला जातात. २२ जानेवारीला देशभर एक वातावरण निर्माण झाले. तशी प्रजासत्ताकदिनीही वातावरण निर्मिती होते. पण हे वातावरण एका दिवसापुरते मर्यादित राहावे असे अपेक्षित नाही. कारण हा गणराज्यदिन आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे वातावरण केवळ एक दिवसापुरते नव्हे तर सदोदित टिकले पाहिजे, अशी अपेक्षा सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी येथे बोलताना व्यक्त केली. महाल संघ मुख्यालयात ध्वजारोहणानंतर ते प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.
संविधान संसदेत मांडण्यात आले. सरकारचा कारभार संविधानाच्या आधारावर चालताे. परंतु आपले गणराज्य आहे. म्हणजे हे प्रजासत्ताक आहे. म्हणून हे राज्य लोकांना चालवायचे आहे. त्यासाठी स्वातंत्र्यासोबतच समता आणि बंधुताही आवश्यक आहे, असेही भागवत यांनी सांगितले.
राज्य चालवण्यात सरकार आणि खासदारांची एक भूमिका आहे. संविधान लागू करणे आणि ते सुरक्षित ठेवणे हे तांत्रिकदृष्ट्या सरकारचे काम आहे. परंतु वास्तविकदृष्ट्या हे आपल्या व्यवहाराचे काम आहे. या करीता आपणही संविधानाचा थाेडा अभ्यास केला पाहिजे. ठळकपणे काही गोष्टी आहेत. एक म्हणजे संविधानाची प्रस्तावना आहे. संविधानात नागरिकांची कर्तव्ये, त्यांचे अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे दिलेली आहे. या गाेष्टी बदलत नाहीत. नागरिकांची कर्तव्ये, त्यांचे अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे म्हणजे देशाचा सामूहिक संकल्प असून त्या नुसार सर्वांचे आचरण असले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.
आम्हाला सगळ्या प्रकारचे स्वातंत्र्य दिले आहे. परंतु संविधान सभेत केलेल्या भाषणात आर्थिक आणि राजकीय स्वातंत्र्यांची तरतुद संविधानात केली असल्याचे डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते. परंतु हे स्वातंत्र्य प्रत्यक्षात येण्यासाठी त्यामागे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे काम करतात. ही तत्वे फ्रेंच राज्यक्रांतीतून नव्हे तर भारतात जन्मलेल्या तथागत गौतम बुद्धांच्या विचारातून घेतल्याचे आंबेडकरांनी सांगितले होते, असेही भागवत म्हणाले.
तिरंग्याच्या केंद्रस्थानी धर्मचक्र
समता आणि स्वातंत्र्य एकाच वेळी देण्यासाठी बंधुभाव हाच उपाय आहे. बंधुभाव हाच धर्म आहे असे त्यांनी म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनी फडकवण्यात येणाऱ्या तिरंग्याच्या केंद्रस्थानी धर्मचक्र आहे. आपल्याला कायद्याचे पालन करायचेच आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकारच्या हाती दंडशक्ती आहे. त्यासाठी पोलिस आणि खूप साऱ्या व्यवस्था आहे, असेही भागवत यांनी यावेळी सांगितले.