लोणी काळभोर, (वार्ताहर)– थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक खोटे आरोप करून जनतेची फसवणूक करीत आहेत; परंतु सभासद सुज्ञ असून त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाहीत. अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल हे शेतकरी व कारखान्याच्या हितासाठी उभे करण्यात आल्याने कारखान्यावर एकहाती वर्चस्व असणार आहे. एक गुंठाही जमीन न विकता कारखाना चालू करून दाखविणार आहोत, अशी ग्वाही कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर यांनी केले.
थेऊर (ता. हवेली) येथील श्री चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी कारखान्याचे माजी अध्यक्ष के. डी. कांचन, जिल्हा बँकेचे माजी संचालक प्रकाश म्हस्के, बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर,
माजी उपाध्यक्ष सुरेश घुले, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, माजी उपसभापती रवींद्र कंद, संचालक सुदर्शन चौधरी, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, राजाराम कांचन, महादेव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, युगंधर काळभोर, लोचन शिवले, लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर, ललिता काळभोर, अलका कुंजीर, नागेश काळभोर, अमित काळभोर, कमलेश काळभोर, बाजीराव भालसिंग, राजेंद्र खांदवे आदी मान्यवर उपस्थित होते.
माधव काळभोर म्हणाले, कारखाना सुरू व्हावा व शेतकर्यांचा विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासन व बँकांची आर्थिक मदत लागणार आहे. कारखान्याची निवडणूक लागली तर सुमारे 1 कोटी रुपयांचा खर्च येईल. हा खर्च टाळण्यासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. यासाठी 6 ते 7 वेळा सभा घेतल्या. दुर्दैवाने त्यात यश आले नाही.
महादेव कांचन म्हणाले, कारखान्यावर 15 वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. या वास्तूला माझे दैवत मानतो. महाराष्ट्रातला एक नंबरचा यशवंत सहकारी साखर कारखाना होता. आजही 15 किलोमीटरच्या परिसरातील शेतकरी आपल्याकडे येणारच आहे. विरोधकांनी खोटे आरोप करू नका. तुमची अंडी किती, पिल्ले किती हे सर्व माहिती आहे. या निवडणुकीत 1 हजार मतांच्या फरकाने शंभर टक्के आम्ही निवडून येणार आहोत.
प्रकाश म्हस्के म्हणाले, आपले जे उमेदवार आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सुशिक्षित आहेत. कारखाना उत्तम पद्धतीने कसा चालवायचा याच्याबद्दल मला अधिक माहिती आहे. त्यामुळे आपण निश्चितच कारखाना चालू करू. दिलीप काळभोर म्हणाले, हा कारखाना प्रशासकाच्या ताब्यात असताना बंद पडला आहे. कारखान्यावर कर्ज असल्याने बँकेच्या ताब्यात आहे. बँकेचे कर्ज भरल्यानंतरच कारखाना सुरु होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेऊन कारखाना चालू करणार आहे.
सुदर्शन चौधरी म्हणाले, खरंतर सर्व उमेदवार हे एक नंबर आहेत. विरोधकांचा पॅनेल हा शेतकरी विकास आघाडी नाही, तर व्यापारी विकास आघाडी आहे. त्यामुळे जनतेने रयत सहकार पॅनेलला मतदान करून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे.
कारखान्यावर पूर्वी जे संचालक झालेले पदाधिकारी आहेत ते आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी नको, अशी चर्चा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झाली होती. तसेच कारखाना सुरु करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे सर्वोतोपरी मदत करायला तयार आहेत.
ज्यावेळेस कारखाना बिनविरोध करायचा होता, तेव्हा जुन्यापैकी कोणी नाही, अशी आपली भूमिका होती; मात्र, एक-दोन जुनी माणसे त्यामध्ये आली म्हणून त्याच्यातून काही फरक पडणार नाही. कोणीतरी अनुभवी असावे लागते. त्यामुळे कारखान्यावर आपलाच विजय नक्की असणार आहे. -सुरेश घुले, माजी उपाध्यक्ष
यशवंत कारखाना म्हणजे हवेलीची भाग्यरेखा आहे. सध्या कारखान्याच्या रथाचे चाक जरी चिखलात रोवले असेल, तरी मायबाप जनतेच्या आशीर्वादाने हे विकासाचे चाक काढण्याचे काम फक्त अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल करेल. चिमणी पेटवण्याचे काम हे आमच्या पॅनेल प्रमुखांनी अगदी मनावर घेतलेले आहे. त्यामुळे विजयाचा गुलाल आपण याच परिसरामध्ये निश्चित उधळणार आहोत. माधुरी काळभोर, माजी सरपंच