मुंबई – राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर अनेक नवीन राजकीय घडामोडींनी वळण घेतले आहे. सध्या शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र येतील? अशी जनतेची भावना आहे. याच विषयी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांना प्रश्न विचारला असता त्यांनी सूचक विधान केले.
राज ठाकरे यांनी वेगळा पक्ष स्थापन केल्यापासून राज्यभरातील जनतेची ठाकरे बंधुंनी एकत्र यावे, अशी भावना आहे. विशेषत: शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर लाखो शिवसैनिक आणि मनसैनिकांची अशी भावना आहे. पण हा निर्णय दोन्ही भाऊ आणि महाराष्ट्रातील दोन पक्षप्रमुखांचा निर्णय आहे. तो निर्णय तेच घेऊ शकतात. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात प्रचंड विचित्र घडामोडी घडल्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत काहीही होऊ शकते, याचा प्रत्यय महाराष्ट्राच्या जनतेला आला आहे.
उद्धव आणि राज हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर फायदाच होईल, असे विधान शर्मिला ठाकरे यांनी केले आहे. त्यांची साद आली तर पाहू. पण त्यांची साद आधी येऊ द्या, असे देखील शर्मिला ठाकरे म्हणाल्या. शर्मिला ठाकरे यांनी अशाप्रकारचे वक्तव्य करुन ठाकरे कुटुंब पुन्हा एकत्रित करण्यास प्रयत्न केला, असे म्हणाणे वावगं ठरणार नाही.
पण त्यावर आता उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणतात ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.शर्मिला ठाकरे यांच्या राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या विधानाने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शर्मिला ठाकरे यांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. येणाऱ्या काळात काय-काय होते ते बघणे महत्त्वाचे ठरेल. सध्याच्या स्थितत त्यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.