जामखेड (प्रतिनिधी) :- येथील शाहरुख पठाण यांनी महावितरण विभागाकडे 1 वर्षांपूर्वी वीज जोडणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी डिमांड नोटची रक्कमही भरली आहे. मात्र अद्याप वीज जोडणीच करण्यात आलेली नाही. तरीही त्यांचा नावे चक्क दोन हजार रूपयाचे बील आकारणी करून तसे देयक पाठविले आहे. त्यामुळे पठाण यांना धक्काच बसला आहे. मागणी करून वीज जोडणी केलेली नाही, उलट वीज कनेक्शन नसतांना बील आकारणी केल्याने वीज महावितरण कंपनीचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
शहरातील युवक शाहरुख पठाण यांनी घरगुती मीटर घेण्यासाठी महावितरण विभागाकडे दि. 5 जून 2022 रोजी अर्ज करून दोन हजार 164 रुपयांचे अनामत रक्कम भरली होती,मात्र गेल्या एक वर्षांपासून अनेक वेळा मागणी करूनही पठाण यांना मीटर बसविण्यात आले नाही उलट वर्षाभरापासून वीज मीटरच नसताना दोन हजार रुपयांचे वीज बिल विद्युत वितरण कंपनीकडून देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून वीज बिल येत असुन याआधी 4 हजार 900 रुपयांचे बील होते. ते पुढील बीलात कमी होऊन 2 हजार रुपये आले आहे. पठाण यांच्याकडे वीज कनेक्शन नसताना एवढ्या रकमेचे बिल आकारणी करून बील अदा केले गेले कसे? असा प्रश्न पडला आहे. या प्रकारामुळे पठाण चांगलेच हादरले आहे.
ज्या वीजेचे कनेक्शन नाही, वीजेचा वापर नाही तर बील दिले कसे, विद्युत मीटर अथवा विद्युत जोडणी नसतानादेखील हजारो रुपयांचे वीज बिल देण्यात आल्याचा हा प्रकार धक्कादायक असून या प्रकाराची चौकशी होणे क्रमप्राप्त ठरते. विद्युत बिल देण्यात आलेल्या नागरिकांना कोणतीही जोडणी न करता विद्युत बिल कसे देण्यात आले.
कदाचित कागदोपत्री यांना विद्युत मीटर व विद्युत जोडणी पूर्ण केल्याचे तर दाखविण्यात आले नाही ना, अशी शंका निर्माण झाली असून या बाबत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असल्याच्या देखील संशय व्यक्त केला जात असून याबाबत वरिष्ठांनी गांभीर्याने चौकशीचे आदेश देऊन यातील सत्यता पडताळण्याची गरज आहे.