महापालिकेत समाविष्ट झालेल्या 11 गावांतील नागरिकांचा सवाल : मूलभूत सुविधांचा अभाव
फुरसुंगी – स्मार्ट शहरांच्या यादीत पुणे शहर दुसऱ्या क्रमांकाने विकास करण्यासाठी निवडण्यात आले होते; परंतु नव्याने सामाविष्ट करण्यात आलेल्या 11 गावांमधे मुलभूत नागरी सुविधांचा पुरता फज्जा उडालेला दिसून येतो. खरच आपले शहर स्मार्ट होणार का? असा प्रश्न समाविष्ट गावांतील नागरिक विचारत आहेत.
विकासाच्या प्रवाहाबरोबर जाताना शहरातील सोयीसुविधा मिळाव्यात या उद्देशाने गावांच्या मागणीनुसार शहरातील हद्दीलगतची अकरा गावे महपालिकेत समाविष्ट करण्यात आली; परंतु गावे पालिकेत समाविष्ट होऊन उंड्री, फुरसुंगी व ऊरुळी देवाची भागातील मुलभूत समस्या तशाच असून त्या सोडवण्यात पालिका प्रशासनाला यश आलेले नाही. काही सोसायट्यांना केवळ पाण्याच्या टॅंकरसाठी महिन्याकाठी प्रत्येकी ऐंशी हजार ते दीड लाख मोजावे लागतात. अनेक भागात ड्रेनेज लाइन नाहीत. त्यामुळे सांडपाण्याची अवस्था दयनीय आहे. रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. परिसरात कचऱ्याचे ढीग दिसतात. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावत आहे. त्यातच पुरेसे लोकप्रतिनिधी नसल्यानेनागरिकांना प्रशासनावर अवलंबून राहावे लागत आहे.
अजूनपर्यंत पालिकेने पुरेशा सुविधा न दिल्याने नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. समाविष्ट भागाच्या विकासासाठी पालिका प्रशासनाने जलद गतीने हालचाल करावी.पालिका असून नसल्यासारखे वाटते.
– निवृत्ती बांदल, सरपंच, उंड्री
सन 1997 मध्ये पालिकेने काही गावांचा समावेश केला. त्याचा विकास आराखडा आता सन 2018 मध्ये म्हणजे तब्बल 20 वर्षांने मंजूर करण्यात आला. मग आम्हाला विकासासाठी आणखी किती काळ वाट पहावी लागणार आहे.
– गणेश ढोरे, नगरसेवक
दोन वर्ष होऊनही पालिकेच्या निधीअभावी या भागाची दुरवस्था झाली आहे. अकरा गावांसाठी पालिकेकडून जास्तीत जास्त निधीचे मिळाल्यास पाणी, रस्ते, ड्रेनेज, पथदिवे, कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने होईल, अन्यथा सर्व गावे आणखीन बकाल होतील.
– सचिन घुले, उपसभापती, पंचायत समिती हवेली
लोकप्रतिनिधीचा अभाव व प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे हा भाग मुलभूत सुविधांपासून वंचित राहिला आहे. तसेच सार्वजानिक स्वच्छतेसाठी कायमस्वरुपी कर्मचारी नाहीत.
उल्हास शेवाळे, माजी सरपंच, उरुळी देवाची
समाविष्ट भागात मोठमोठे गृहप्रकल्प झाले असून त्यातील ऍमिनिटी स्पेसच्या अनेक जागा शिल्लक आहेत. या जागा पालिकेने ताब्यात घेऊन त्या ठिकाणी समाजपयोगी प्रकल्प राबवावेत.
– नागेश हरपळे, सामाजिक कार्यकर्ते, फुरसुंगी