पुणे – ई-कॉमर्स कंपन्या आपल्या व्यासपीठावरून कुटीर, छोट्या आणि मध्यम उद्योगांचा माल उपलब्ध करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी या कंपन्या छोट्या उद्योगांबरोबर आणि या उद्योगांच्या संघटना बरोबर सहकार्य करार करीत आहेत. मात्र, यामुळे रिटेल उद्योगाचे नुकसान होणार आहे, असे व्यापाऱ्यांच्या संघटनेने म्हटले आहे.
ई-कॉमर्स कंपन्यांनी छोट्या उद्योगांकडून थेट माल घेऊन आपल्या व्यासपीठावरून उपलब्ध करून दिल्यानंतर किरकोळ विक्रेत्यांचे नुकसान होईल. आम्हाला हे मान्य नाही असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हणजे सीईआयटीने म्हटले आहे. यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात सीईआटीने म्हटले आहे की, यासंबंधात लघु उद्योग मंत्रालय पुढाकार घेत आहे. आम्ही लघुउद्योग मंत्रालयाला पत्र पाठवून असा निर्णय घेतल्यास अडचणीत असलेल्या व्यापाऱ्यावर आणखी परिणाम होईल.
रिटेल क्षेत्रासाठी नियंत्रकाची गरज
जागतिक पातळीवरील ई-कॉमर्स कंपन्या जागतिक आर्थिक दहशतवादी असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे. त्यांच्याकडून भारतासारख्या देशात आर्थिक घुसखोरी होत आहे. त्यांच्याकडे असलेल्या पैशांचा वापर करून ते किंमती पाडतात आणि कायद्याकडे दुर्लक्ष करतात. यावर मार्ग म्हणून मंत्रालयाने व्यापार क्षेत्रासाठी लोकपाल नेमावा. त्याच बरोबर या क्षेत्रासाठी नियंत्रक नेमण्याची गरज असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.