नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या प्रसारास अटकाव करण्यासाठी देशभरामध्ये लागू करण्यात आलेल्या २१ दिवसांच्या लॉक डाऊनची मुदत येत्या मंगळवारी पूर्ण होत आहे. मात्र भारतातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता लॉक डाऊनची मुदत वाढवण्यात येईल असे अंदाज व्यक्त केले जातायेत. दरम्यान, हाती आलेल्या वृत्तानुसार देशातील लॉक डाउनचा कालावधी वाढवणार की नाही याबाबतचा उलगडा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार असल्याचं समजतंय.
प्राप्त माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (शनिवारी) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी लॉकडाऊनबाबत चर्चा करणार असून या चर्चेनंतर ते लॉक डाऊनबाबतचा पुढील निर्णय जनतेशी संवाद साधताना घोषित करतील. कोरोनानंतर देशावर मोठे आर्थिक संकट ओढवण्याची शक्यता लक्षात घेता १४ एप्रिलनंतर लागू करण्यात येणाऱ्या लॉक डाऊनमधून काही क्षेत्रांना वगळले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
देशभरातील ६०० जिल्ह्यांपैकी ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झाला आहे. कोरोनाग्रस्त जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांमध्ये लॉक डाऊन संबंधीचे नियम काही प्रमाणात शिथिल केले जातील अशी चर्चा देखील प्रशासकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.