नवी दिल्ली – आगामी पाच राज्यांमधील विधानसभा आणि 2014मधील लोकसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपविरोधात “इंडिया’ (India) आघाडी स्थापन करण्यात आली आहे.
या आघाडीत “ऐकला चलो’चा नारा देणाऱ्या बसपच्या अध्यक्षा मायावती (Mayawati) यासुद्धा विरोधकांच्या इंडिया आघाडीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे.
काही दिवसापूर्वींच कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka gandhi) यांनी त्यांची भेट घेतल्याचे आज समोर आले आहे. दरम्यान, मायावती इंडिया आघाडीत सहभागी झाल्यास विरोधकांना “हत्ती’चे बळ मिळणार आहे.
आगामी 2024 मधील लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशभरातील विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया आघाडी उघडली आहे. या आघाडीच्या आतापर्यंत तीन बैठका पार पडल्या आहेत.
असे जरी असले तरी अद्यापही देशातील काही पक्ष तटस्थ असून, ते ना एनडीएचा भाग आहेत ना इंडियाचा. त्यामधीलच एक पक्ष म्हणजे मायावतींचा बसप. या पक्षाने आपण कोणत्याही गटात जाणार नसून, तटस्थ राहणार असल्याची घोषणा केली होती.
यादरम्यान मात्र आता एक मोठी घटना समोर आली आहे. यामुळे बसप इंडिया आघाडीत सहभागी होण्याची चर्चा होत आहे. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला हरविण्यासाठी इंडिया आघाडी एकही संधी सोडत नसल्याचे चित्र आहे.
त्यामध्ये आता कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी आणि बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांच्यात गेल्या महिन्यात बैठक झाली होती. आता बसपच्या नेतृत्वाशी जवळीक साधलेल्या एका माजी खासदाराचीही यात महत्त्वाची भूमिका असल्याचे बोलले जात आहे.
कॉंग्रेसचा पुढाकार
कॉंग्रेस बसपसोबत युती करण्यात अधिक रस घेत आहे. कारण, म्हणजे बसपकडे अजूनही 10-12 टक्के व्होट बॅंक आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी बागेश्वर (उत्तराखंड) विधानसभेच्या जागेबाबत सपाविरोधात केलेल्या वक्तव्याचाही याच्याशी संबंध जोडला जात आहे.
हायकमांडकडून सूचना मिळाल्यानंतरच अजय राय यांनी हे वक्तव्य केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बसप आणि कॉंग्रेस यांच्यामध्ये युती होती.
यावेळी 125 जागांवर कॉंग्रेस आणि उर्वरित 278 जागांवर बसप लढवणार हे निश्चित झाले होते. मात्र, त्यानंतर यामध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने ही युती तुटली होती. त्यानंतर आता पुन्हा प्रयत्न केले जात आहे.