दुबई :- आशिया करंडक स्पर्धा जिंकल्यानंतरही भारतीय संघाला आयसीसीच्या एकदिवसीय सामन्यांच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यात यश आले नाही. या स्पर्धेत बांगलादेशकडून पराभव झाल्यामुळे भारताचे रेटिंग कमी झाले व गुणतालिकेतही पाकिस्तानने बाजी मारत पुन्हा अव्वलस्थान मिळवले.
आता भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यात जर भारताने निर्विवाद वर्चस्व राखले तर भारतीय संघाला पुन्हा क्रमवारीत अव्वलस्थान मिळवण्याची संधी आहे. ऑस्ट्रेलियानेही अव्वलस्थान मिळवले होते. मात्र, त्यांना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला व त्यांनीही अव्वलस्थान गमावले.आता ऑस्ट्रेलियन संघ पाकिस्तान आणि भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिका चौथ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंड विरूध्द ३-१ ने मालिका जिंकूनही इंग्लंडचा संघ क्रमवारीत चौथ्या वरून पाचव्या स्थानावर घसरला. न्यूझीलंडची पाचव्या स्थानावरून सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. क्रमवारीत बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान अनुक्रमे सातव्या, आठव्या आणि नवव्या स्थानावर आहेत. दहाव्या क्रमांकावर असलेल्या वेस्ट इंडिजला विश्वचषकासाठी पात्रता मिळवता आलेेेली नाही.
एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्धची तीन सामन्यांची मालिका जिंकावी लागेल. भारतीय संघाने ही मालिका २-१ अशा फरकाने जिंकली तर भारत वनडे क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचेल.