Manoj Jarange Patil and Girish Mahajan : राज्य सरकारला मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिलेला वेळ संपला असून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे आमरण उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, त्यांची मनधरणी करण्यासाठी (Manoj Jarange Patil) मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी फोनवरून संपर्क केला. उपोषण करु नका, असं आवाहन मंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे.
गिरीश महाजन यांनी फोन केल्यानंतर मनोज जरांगे यांनी,”तुम्ही एक महिना मुदत मागितली. तुमच्या शब्दाला मान देत आम्ही एक महिन्याऐवजी 41 दिवस दिले, आता अडचण काय आहे, आमचं काय चुकलं, असा सवाल जरांगे यांनी महाजन यांना केला आहे. तर पुढे बोलताना गिरीश महाजन यांनी,’समितीचा अभ्यास सुरू असून आरक्षण लवकरच मिळेल, काहीतरी सकारात्मक होईल, साखळी ठेवा मात्र आमरण उपोषण नका करू, असं म्हणत गिरीश महाजन यांच्याकडून जरांगेना विनवणी करण्यात आली.
समितीचा अभ्यास 40 वर्षांपासून सुरूच आहे, मराठा आंदोलकांवरील खटले दोन दिवसात मागे घेतो, ते अजून मागे घेतलेले नाहीत, असं प्रत्युत्तर जरांगे यांनी महाजन यांना दिलं आहे. मराठा आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, तुम्ही म्हटले होते, अजून एकही गुन्हा मागे घेतलेला नाही. तुमच्याकडून तेही होत नाही आणि तुम्ही आरक्षण काय देणार, असं जरांगे यांनी महाजन यांना म्हटलं. आता 15 -16 जणांनी आत्महत्या केल्या त्याबद्दलही सरकारला काही सहानभूती नाही. आत्महत्याग्रस्त कुटुंबाना मदत करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश द्या, असे आवाहन जरांगे यांनी केले आहे.
तर तुम्ही उपोषण मागे घ्या, आपण मार्ग काढू, मराठा आरक्षणासाठी सरकार गंभीर आहे. देऊन टाका, देऊन टाका, असं आरक्षण देता येणार नाही. आम्हाला असं आरक्षण द्यायचं आहे, त्याला कुणीही चॅलेंज करु शकत नाही. न्यायालयात आव्हान देता येणार नाही. त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या, समाजाला आंदोलन उग्र करु नका, आत्महत्या करु नका, असं मराठा समाजाला आवाहन करण्याची मागणी गिरीश महाजन यांनी केली आहे.