नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी आणणार योजना
पुणे – शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्यांबाबत सरकार विचार करत असून त्याची माहिती बॅंकांकडून मागविली आहे. त्याबाबत सरकार सकारात्मक असून नियमित कर्ज फेडणाऱ्यांसाठी योजना सरकार आणणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.
मांजरी येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट संस्थेच्या 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पुरस्कार वितरण कार्यक्रम त्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ठाकरे बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, सहकार व अर्थमंत्री जयंत पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, आमदार अजित पवार, राजेश टोपे, कलाप्पा आवाडे, हर्षवर्धन पाटील, माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, इंडियन शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष रोहित पवार, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, संस्थेचे महासंचालक शिवाजीराव देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, सर्वांचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. साखर उद्योग शेतकऱ्यांचा कणा असून शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. शेतकऱ्यांचा पाठीराखा म्हणून सरकार काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. याशिवाय मराठवाड्यातील जालन्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याचा राज्य शासन तातडीने निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय, उद्योगांसमोर असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारच्या वतीने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करून धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार आहे. सहकार मंत्री जयंत पाटील म्हणाले, साखर कारखानदारी अडचणीत आहे.
“ऊस विकास कार्यक्रमाची आवश्यकता’
शरद पवार म्हणाले, साखर व्यवसाय हा महाराष्ट्रातील ग्रामीण व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. या व्यवसायामुळे राज्याला चांगले आर्थिक उत्पन्न होत आहे. उसाची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकास कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे प्रत्येक कारखान्यांनी ऊस विकासासाठी विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले.