आरिफ शेख
इजिप्तच्या जगप्रसिद्ध पुरातन संस्कृतीचा विषय निघाला की प्रथम आठवते ती नाईल नदी. तिच्या वरदानामुळेच इजिप्तची सर्वांगीण प्रगती झाली.आज हीच नदी इजिप्तकरिता धोक्याची घंटा ठरत आहे. कारण झाले आहे इथिओपियाने ब्लू नाईलवर उभारलेले आफ्रिकेतील सर्वात मोठे धरण.
जगातील सर्वात मोठ्या व लांब नदींपैकी एक असणाऱ्या नाईल नदीच्या पाण्यावरून इजिप्त व इथिओपिया या देशांत चांगलीच जुंपली आहे. ग्रॅंड इथोपियन रेनिसन्स डॅम या महाकाय धरणाचे काम इथिओपियाने 2011 मध्ये हाती घेतले होते.ते आता 80 टक्के पूर्ण झाले आहे. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेला इथिओपिया आजवर विकासापासून वंचित. 60 टक्के जनता अंधारात. त्यांच्या जीवनात विकासाचा प्रकाश निर्माण करण्याचा विडा इथिओपियाचे दूरदर्शी पंतप्रधान अबी अहमद यांनी उचलला. ऊर्जेशिवाय हे शक्य नाही. त्यांनी नाईल नदीवरील हायड्रो पॉवर प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा निर्धार केला. तब्बल साडेसहा हजार मेगावॅट वीजनिर्मिती या प्रकल्पाद्वारे केली जाईल. इथिओपियात हा प्रकल्प राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनला आहे, तर इजिप्तसाठी तो जीवन मरणाचा प्रश्न झाला आहे. वरील डॅममुळे नाईलचा प्रवाह संथ होईल, किंबहुना तो काही प्रमाणात रोखला देखील जाईल. 74 बिलियन क्यूबिक मीटर पाण्याचा त्याद्वारे संचय होईल. अकरा कोटी लोकसंख्येला याचा लाभ होईल. नाईलच्या पाण्यावर आजपर्यंत इजिप्तचा शब्द प्रमाण मानला जात होता. 1922 साली झालेल्या अँग्लो इजिप्शियन ट्रिटीद्वारा नाईलच्या पाण्याचे सर्वाधिकार इजिप्तला देण्यात आले होते. नदीवर धरण बांधण्याविरोधात व्हेटोचे अधिकार इजिप्तच्या अखत्यारीत होते.
1970 ला सुदान व इथिओपियाशी इजिप्तचा पाण्यावरून वाद झाला. इजिप्तने लष्करी कारवाईची धमकी दिली. नंतर या दोन्ही देशांतील बंडखोरांना इजिप्तची सर्व प्रकारची रसद पुरविली व तेथे अस्थिरता निर्माण केली. पुढे हा विषय थंड पडला, असो.आफ्रिकेतील व्हिक्टोरिया सरोवरातून तिचा उगम होत, पुढे दहा देशांचा प्रवास करीत ती भूमध्य समुद्रात विलीन होते. या प्रवासात तिला इथिओपियातील तीन उपनद्या ब्लू नाईल, सोबात व अतबारा या मिळतात. यापैकी ग्रॅंड डॅमची उभारणी ब्लू नाईलवर करण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाला तर त्याचा सर्वात मोठा फटका इजिप्तला बसेल. तेथील शेती धोक्यात येईल. आपल्या गरजेपैकी निम्मे अन्नधान्य इजिप्त आयात करीत असतो. वरील प्रकल्पामुळे हे चित्र आणखी गडद होईल. नाईलवर धरण उभारू नका, म्हणून इजिप्तने इथिओपियाला नेहमी प्रमाणे धमक्या दिल्या. मात्र इथिओपियाने त्यास दाद दिली नाही.
कोणाचीही मदत न घेता इथिओपिया स्वतः चार बिलियन डॉलर या प्रकल्पासाठी खर्च करीत आहे. यात खोडा घालण्यासाठी इजिप्तने अन्य आफ्रिकी देशांना साद घातली. सुदान प्रारंभी इजिप्तच्या बाजूने होता. पुढे त्याने भूमिका बदलली. या प्रकल्पामुळे पूरनियंत्रण होऊन सुदानचा एक प्रकारे फायदाच होणार होता. नाईलच्या महापुरामुळे दरवर्षी सुदानची वाताहत होत असे. या प्रकल्पात निर्माण होणाऱ्या विजेपैकी काही टक्के वीज सुदानला मोफत देण्याचे आमिष इथिओपियाने दाखविले आहे. अन्य शेजारी आफ्रिकी देशांना कमीदरात वीजपुरवठा करण्याचे आश्वासन इथिओपियाने दिले. त्यामुळे आफ्रिकी व शेजारील देश इथिओपियाच्या बाजूने उभे ठाकले. तुलनेने इजिप्त एकाकी पडला आहे.
इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद हे थोर मुत्सद्दी गणले जातात. एरिट्रीया या शेजारील देशाशी वीस वर्षांपासून चालू असलेले युद्ध त्यांनी थांबविले, शिवाय एरिट्रीयाला त्याचा भूभाग परत देऊन टाकला. देशांतर्गत सुधारणा राबविल्या. विरोधकावरील राजकीय केसेस मागे घेतल्या. ऊर्जेचा भक्कम स्रोत असेल तरच अन्य विकास योजना राबविता येतील, यासाठी त्यांनी वरील प्रकल्प हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा बनविला. या सर्व कामगिरीची दखल घेत गतवर्षी अहमद यांना जागतिक शांततेचे नोबेल पारितोषिक बहाल करण्यात आले. इथिओपियाचे नेल्सन मंडेला म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा या थोर व मुत्सद्दी नेतृत्वापुढे इजिप्तचा निभाव लागणे कठीण होते. नाईलच्या पाण्यावरील इजिप्तची वर्षानुर्षांची दादागिरी त्यांनी मोडून काढली.
अमेरिका, रशिया, चीन व युरोपिय महासंघाने इथिओपियाची बाजू उचलून धरली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी या वादात हस्तक्षेप करून नव्याने समझोता करण्याचा दबाव इजिप्तवर वाढविला आहे. एकाकी पडलेल्या इजिप्तला आता इथिओपियाशी करार केल्याशिवाय पर्याय दिसत नाही.
इथिओपियाला धरण बांधण्यापासून रोखणे शक्य नसल्याचे इजिप्तच्या ध्यानात आले आहे.धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्काळ पाणी अडविण्याऐवजी अकरा ते एकवीस वर्षांत टप्प्याटप्प्याने हे पाणी अडवावे, जेणेकरून इजिप्तच्या शेतीवर अकस्मात दुष्परिणाम होणार नाही, असा प्रस्ताव इजिप्तने मांडला आहे. मात्र सहा वर्षांत धरणात पूर्ण क्षमतेने पाणी अडवू, त्या पेक्षा अधिक काळ आपण थांबणार नाही, असे इथिओपियाने निक्षून सांगितले आहे. नाईलने इजिप्तला मानवी इतिहासात नवी ओळख दिली. जगातील सर्वात समृद्ध संस्कृती तेथे फुलली. शेती बहरली. ज्या पिरॅमिडमुळे इजिप्तचा भूतलावर गवगवा आहे, त्या पिरॅमिडचे दगड नाईलमधून जलवाहतुकीने आणले गेले होते. महापूर ही तशी आपत्ती मानली जाते.
nileइजिप्तसाठी मात्र महापूर वरदान ठरत होता. पूर ओसरल्यावर नदीकाठच्या भूभागावर सुपीक मातीचा थर पसरत असे. त्याद्वारे नवे पीक शेतकरी घेत. त्यातून अधिक उत्पन्न मिळे. इथिओपियामुळे नाईल आता इजिप्तसाठी जीवनदायिनी राहणार नाही. वरील धरण इजिप्तच्या मुळावर उठले आहे. तेथील बेरोजगारी 14 टक्के होती, ती निम्म्यावर आणण्यात सरकारला यश आले आहे. नाईलचे पाणी रोखले गेले तर इजिप्तच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल. नाईलच्या पाण्यावर अग्रहक्क कोणाचा? पाणलोट क्षेत्रातील देशांचा की लाभक्षेत्रातील देशांचा? याची चर्चा नव्याने आफ्रिकी खंडात सुरू झाली आहे. पाण्यासारख्या अतिसंवेदनशील मुद्द्यावर इथिओपियाने इजिप्तची पुरती कोंडी केली आहे. सुदानने इजिप्तची साथ सोडल्याने तो अधिकच एकाकी झाला आहे. बुट्रस घाली हे युनोचे सरचिटणीस होते. ते मूळचे इजिप्शियन.पदावर असताना ते एकदा म्हणाले होते, जगात इथून पुढचे युद्ध तेलासाठी नव्हे तर, पाण्यासाठी होतील, त्यांच्या या दूरदर्शी भाकिताची झळ स्वदेशालाच बसण्याची चिन्हे दिसत आहेत.