रत्नागिरी- करोना महामारीचे संकट संपल्यावर जिल्ह्याला पायाभूत, मुलभूत सुविधांकरिता ग्रामविकास खात्यामार्फत भरघोस निधीची उपलब्धता करुन देण्यात येणार असून कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. कोकणातील सर्व विकासकामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
म्हाप्रळ-आंबेत पुलावरील वाहतुकीस पर्याय देणाऱ्या फेरीबोटीच्या जेटीचे कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते म्हाप्रळ येथे करण्यात आले. तसेच मंडणगड येथेही त्यांनी भेट दिली.
अब्दुल सत्तार म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही. याबाबत प्रशासनास खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. खार जमीन विकास करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे.
हर्णे, बाणकोट, बुरोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जांभा दगड बंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.