कातरखटाव -गेल्या महिन्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने खटाव तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. तालुक्यात सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्राचे पंचनामे झाले असून आठ-साडेआठ हजार लाभार्थी आहेत. नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वच पक्षांच्या नेत्यांनी लवाजम्यासह हजेरी लावली; परंतु दिवाळी तोंडावर आली तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झालेला नाही. करोनाच्या काळात बळीराजाची दिवाळी गोड होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गेल्या महिन्यात परतीच्या मुसळधार पावसामुळे खटाव तालुक्यात कान्हरवाडी, कणसेवाडी, एनकूळ, कातरखटाव, पळसगाव, खातवळ, येलमरवाडी, र्बोंबाळे, डांभेवाडी या गावांमध्ये काही ठिकाणी नाला बंडिंग, बंधारे फुटल्याने पिकांबरोबर जमिनीचे नुकसान झाले आहे. मका, भुईमूग, सोयाबीन, मटकी, मूग, बाजरी ही हातातोंडाला आलेली पिके पाण्यात गेली.
कान्हरवाडीसह काही भागातील शेतात अजूनही पाणी दिसत आहे. त्यामुळे रब्बी पेरण्यांचा हंगाम वाया जाण्याची भीती आहेत. दिवाळी तोंडावर येऊनही राज्य शासनाच्या मदतीचा पत्ताच नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाणार का, अशी चर्चा आहे. पंचनाम्यांची कागदोपत्री जमा करण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासकीय मदत सामान्य शेतकऱ्याच्या हातात कधी पडणार, असा प्रश्न विचारला जात आहे.