मुंबई : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याचप्रमाणे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा करण्याचा सरकारचा मानस असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. दरम्यान, श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला जात आहे. त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी ट्वीटद्वारे उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टीका केली आहे.
आशिष शेलार यांनी आज सकाळी एक ट्विट करत यात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शेलारयांनी केलेल्या ट्विटमध्ये, “आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात. उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात? त्यांना श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये.? काळजात ज्यांच्या “मराठीपणाची” काळजीच उरली नाही. मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा यांना मराठी म्हणावे की नाही?” असे म्हटले आहे.
आझाद काश्मीरवाल्या मेहक प्रभूला जे क्लीनचीट देतात..
उमेश कोल्हेचा गळा चिरणाऱ्यांना संरक्षण देतात???
त्यांना श्रध्दा वालकरच्या निर्घृण हत्येची हळहळ वाटू नये..?काळजात ज्यांच्या "मराठीपणाची" काळजीच उरली नाही
मुंबईकर हो, आता तुम्ही सांगा
यांना मराठी म्हणावे की नाही?— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 26, 2022
दरम्यान, मुंबईत आझाद काश्मीरचा फलक झळकवणाऱ्या मेहक प्रभूला २०२० मध्ये उद्धव ठाकरे यांनी क्लीनचिट दिली होती. तर, उमेश कोल्हे यांची हत्या चोरीच्या उद्देशाने झाली, असे सांगून या हत्याकांडातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न अमरावती पोलीस करत होते. पोलिसांवर दबाव अमरावतीच्या तत्कालीन पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा होता, असा आरोपा भाजपाने केलेला आहे.
तसेच, श्रद्धा वालकर हत्याप्रकरणी आरोपीला लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी यासाठी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती करणार असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली आहे.