नवीदिल्ली – गुजरातमधील मोरबीमध्ये नदीवरील ब्रिज कोसळल्याची दुर्घटना घडली होती. यात १३० हुन अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. मच्छू नदीवर झालेल्या या अपघाताचा सीसीटीव्ही देखील समोर आला होता. या अपघातात अपघातग्रस्ताच्या मृत्यूचे नेमके कारण काय होते याबाबत राष्ट्रीय आपत्ती दलाच्या प्रमुखांनी भाष्य केलं आहे. अपघात झाला त्यावेळी नदीच्या दोन्हही टोकांना पाण्याची पातळी कमी असल्याचे त्यांनी सांगितले.
पाण्याची पातळी कमी असल्यामुळे वरून पडलेले लोक थेट खडकांवर आपटले. पूल उंच असल्यामुळे वरून पडणाऱ्या लोकांचा वेग जास्त होता त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असल्याची माहिती एनडीआरएफचे कमांडंट व्हीव्हीएन प्रसन्ना कुमार यांनी दिली. कुमार हे नदीतील सर्च ऑपरेशनचा देखील महत्वाचा भाग होते.
काय म्हणाले नेमकं कुमार यावेळी
मृतदेहांचा शोध घेण्यासाठी आम्ही कॅमेरा आणि सोनार उपकरण जोडण्यात आलेल्या अल्ट्रामॉडर्न रिमोट अंडरवॉटर वाहनाचा वापर करत आहोत.
नदीच्या मधल्या भागात पाणी स्थिर असून २० फूट खोल आहे.पाणी गढूळ असल्याने दृश्यमानता कमी आहे.
नदीच्या तळाला दगड आहेत म्हणून अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत तसेच अनेकजण जखमी झाले आहेत.
वाहते पाणी नसल्यामुळे मृतदेह वाहून गेले नाहीत तर तळाशी सापडले आहेत.
सीसीटीव्ही देखील आला समोर
पुलाच्या अपघाताच्या सीसीटीव्हीमध्ये काही तरुण पुलावर उभे असल्याचे दिसतात.अनेकजण यावेळी मोबाईलवरून फोटो देखील काढताना दिसत आहेत. त्यातीलच काही जण हुल्लडबाजी करत जोरजोरात ब्रिज हलवताना दिसत आहेत. त्याच वेळी पूल तुटतो आणि सर्वजण खाली कोसळतात. प्रत्यक्षदर्शनी असलेल्या अनेकांनी देखील काही जण मुद्दाम पूल हलवत असल्याचे सांगितले आहे. रविवारी संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली होती.