मुंबई : राज्यात रवी राणा-बच्चू कडू यांच्यातील वादाने एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त करत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला होता. तर बच्चू कडू यांनीही अमरावतीत आयोजित मेळाव्यात याबाबत भूमिका स्पष्ट केली. तसेच रवी राणा यांना माफ केल्याचे विधान केले. दरम्यान, बच्चू कडूंच्या विधानानंतर आमदार रवी राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
याविषयी बोलताना रवी राणा यांनी,“देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानंतर मी माझ्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली होती. मी दोन पावलं मागे आल्यानंतर बच्चू कडूंनी चार पावलं मागे घेतले आहेत. तसेच त्यांनी माझे आभारही मानले आहे. त्यामुळे आमच्यातला वाद आता मिटला आहे”, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे.
“महाराष्ट्रात तरुणांचे, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तसेच राज्याला आता सक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत. ते दोन्हीही माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीने आम्ही आता राज्यातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे”, असेही ते म्हणाले.