मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या माध्यमातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात घटनाक्रम घडवण्यात आले. परमबीरसिंग यांना वाचवण्यासाठी एनआयएने त्यांना आश्वासित केले. त्यामुळेच एनआयएच्या चार्जशीटमध्ये परमबीरसिंग यांना आरोपी करण्यात आलेले नाही.
त्यांना वाचवण्यासाठी अनिल देशमुख यांच्यावर भाजपच्या माध्यमातून खोटे आरोप करण्याचे कटकारस्थान झाले, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नवाब मलिक म्हणाले, एनआयएने जी चार्जशीट दाखल केली आहे, त्यामध्ये सायबर एक्सपर्टच्या माध्यमातून बोगस पुरावे तयार करण्यासाठी परमबीरसिंग यांनी पैसे दिले होते, अशी माहिती सायबर एक्स्पर्टने दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.
तसेच एनआयएने जी चार्जशीट दाखल केली आहे. त्यामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांची चौकशी झाली नाही. त्यांना आरोपी करण्यात आलेले नाही. एक्स्टॉरशनसाठी हे सगळं कटकारस्थान सचिन वाझे यांनी केले आहे. त्यात पूर्ण सत्य आहे असे आमचे मत नाही. बरचसं काही यातून बाहेर येऊ शकत होते. परंतु एनआयएने तसा काही तपास केला नाही. काही लोकांना वाचवण्यासाठी काम केले आहे. परमबीरसिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्याने त्यांना जीवदान देण्यात आले, असा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.
दरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी 4 सप्टेंबर रोजी एनआयए कोर्टात दहा हजार पानांची चार्जशीट सादर करण्यात आली. यामध्ये अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं का ठेवली, याचं कारण देण्यात आले. याच चार्जशीटवर आक्षेप घेत त्यामध्ये परमबीरसिंग यांचे नाव का नाही, असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.