लाहोर – गेल्या काही आठवड्यापासून पाकिस्तानात गव्हाच्या पिठाची किंमत गगनाला भीडत असल्याचे दिसून येत आहे. रोटी आणि नान हे पाकिस्तानातील प्रमुख अन्नपदार्थ आहेत. पिठाच्या किमतीत प्रचंड वाढ झाल्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत. सरकारी अनुदानित पीठ गोळा करण्यासाठी लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. 7 जानेवारी रोजी सिंधमधील मीरपूर खास येथे अशाच एका वितरण साइटवर झालेल्या चेंगराचेंगरीत एका 35 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
केंद्र आणि प्रांतीय सरकारांनी या संकटासाठी एकमेकांवर आरोप केले आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, रशिया-युक्रेन युद्ध, 2022 मधील विनाशकारी पूर आणि अफगाणिस्तानमधील गव्हाची तस्करी झाल्यामुळे दीर्घकालीन तूट आहे. रशियाकडून गव्हाची खेप आता पाकिस्तानात पोहोचली असून येत्या आठवड्यात काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
पंजाब आणि सिंध या दोन गहू उत्पादक राज्यांमध्ये गव्हाचा आटा पाकिस्तानी रुपया (PKR) 145/kg ते 160 पाकिस्तानी रुपये/kg या दराने विकला जात आहे. खैबर पख्तूनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये किंमती जास्त आहेत. गल्फ न्यूजमधील एका लेखानुसार, पाकिस्तानमध्ये 5 किलो आणि 10 किलो आट्याच्या पिशव्याच्या किंमती एका वर्षापूर्वीच्या तुलनेत जवळपास दुप्पट झाल्या आहेत. इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये एक नान 30 पाकिस्तानी रुपयांना विकले जात आहे, तर एक रोटी 25 पाकिस्तानी रुपयांना विकली जात आहे.
दरवाढीचे नक्की कारण काय?
पाकिस्तान आपल्या वापराच्या गरजा भागवण्यासाठी गहू आयात करतो, ज्यातील मोठा हिस्सा रशिया आणि युक्रेनमधून येतो. उदाहरणार्थ, ऑब्झर्व्हेटरी ऑफ इकॉनॉमिक कॉम्प्लेक्सिटी (OEC) च्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानने 2020 मध्ये $1.01 अब्ज किमतीचा गहू आयात केला, त्यापैकी बहुतांश युक्रेन ($496 दशलक्ष), त्यानंतर रशिया ($394 दशलक्ष) मधून आला. या वर्षीच्या युद्धामुळे पुरवठा खंडित झाला, तर गेल्या वर्षीच्या पुरामुळे देशांतर्गत उत्पादनात घट झाली. अहवालात म्हटले आहे की, पाकिस्तानमधील समस्या अपुर्या साठ्यापेक्षा वितरणाची आहे.
पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले की, “सिंध आणि बलुचिस्तानमध्ये गव्हाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या, कारण पुरामुळे लक्षणीय साठा नष्ट झाला. अफगाणिस्तानात गव्हाची तस्करी हा देखील एक घटक आहे. परिणामी स्थानिक टंचाई, किंमती वाढतात मात्र, शासकीय गोदामांमध्ये गव्हाचा पुरेसा साठा आहे. वितरणास उशीर झाल्यामुळे तुटवडा आणि परिणामी किंमती वाढल्या, ज्यावर आता लक्ष दिले जात आहे.”