नेवासा – तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसानभरपाई व अनुदान मिळाले नाही. काल-परवा वादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले यावर माजी लोकप्रतिनिधी का शांत बसून आहे? त्यांच्या पक्षाचे सरकार असूनही ते गप्प का? याचे उत्तर त्यांनी जनतेला दिले पाहिजे. तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही, तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे आ. शंकरराव गडाख यांनी या वेळी सांगितले.
रस्तापूर (ता. नेवासा) येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना दुरुस्ती 2 कोटी 9 लाख रुपये, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्तापूर हिंगळादेवी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 2 कोटी 14 लाख, अर्थ संकल्प 2020-2021 अंतर्गत रस्तापुर-चांदा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे 1 कोटी 26 लाख असे या एकूण 3 कोटी 49 लाख रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी आ. गडाख म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे केळी, डाळिंब या फळबागांचे मोठे नुकसान झाले. घरांची पडझड होऊन अनेकांचे प्रपंच उघड्यावर आले आहेत. हे पंचनामे तातडीने करण्यासाठी प्रशासनाला व्यक्तिगत सूचना केल्या आहेत. पंचनामे 2 दिवसांत पूर्ण करण्याची मागणी केली आहे.
…तर तातडीची मदत मिळवून द्यावी
तालुक्यातील विकासकामांत खोडा घालण्यासाठी सत्तेचा वापर करणाऱ्या माजी लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरचं काळजी असेल तर शासनदरबारी प्रयत्न करून शेतकऱ्यांना तातडीची मदत आणण्यासाठी प्रयत्न करावे, अशी टीका आ. गडाख यांनी माजी आ. बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव न घेता केली.