नवी दिल्ली – जगभरात 2020 हे करोना वर्ष ठरले. या विषाणूने सगळीकडे हाहाकार माजवला. अमेरिकेसारखी संपन्न राष्ट्रे त्यापुढे बेजार झाली. जगात सगळ्यांत जास्त बळी अमेरिकेतच गेले आणि सगळ्यांत जास्त बाधितही याच देशात आढळले. त्यानंतर भारतात बाधितांची संख्या दुसऱ्या क्रमांकावर होती.
भारतात अन्य देशांच्या तुलनेत लोकसंख्येची घनता अधिक आहे. असे असूनही 2021 हे वर्ष उजाडता उजाडता करोनाचा विषाणू भारतात दुबळा का ठरला याने सगळ्यांना चकित केले असून आता तज्ञ मंडळी याचे विश्लेषण करण्याच्या कामात गुंतले आहेत.
गेल्या वर्षाच्या सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या सुमारास एक वेळ अशी आली होती की बाधितांच्या संख्येत भारत आता अमेरिकेलाही मागे टाकेल आणि त्या तुलनेत भारतात आरोग्य सुविधा अगदी तुटपुंज्या आहेत. त्यामुळे येथे हाहाकार माजेल असे मानले जात होते. मात्र नंतर करोनाचा वेग मंदावला. त्यामागे नक्की काय कारण असेल याचा अभ्यास आता सुरू झाला आहे.
सप्टेंबर महिन्यात भारतात दिवसाला 1 लाख नवे रूग्ण सापडत होते. ऑक्टोबर महिन्यात त्यात थोडी घसरण पहायला मिळाली. नंतर करोनाचा वाढता आलेख खाली येत गेला. जानेवारीत दिवसाला 10 हजार नवे बाधित इतका हा आकडा खाली आला. याचे नक्की कारण काय असेल याने सगळ्यांना चकित केले आहे. त्यामुळे आता हे कोडे सोडविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात विशेषत: फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रूग्णसंख्या वाढते आहे. मात्र तरीही करोनाच्या पहिल्या लाटेत जो कहर आणि जो आलेख जगभरात उंचावला होता. ती स्थिती भारतात उदभवलीच नाही असेही तज्ञांचे म्हणणे आहे.