दुबई – बीसीसीआय व निवड समिती तसेच मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार सातत्याने ऋषभ पंतला संघात स्थान देत आहेत. सातत्याने बेजबाबदार पद्धतीने बाद होत संघाच्या पराभवाचे कारण ठरत असलेल्या पंतचे इतके लाड कशासाठी, असा संतप्त सवाल चाहते करत आहेत.
आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात बेजबाबदार पद्धतीने फटका मारून पंत बाद झाला होता. याच पद्धतीने तो सातत्याने बाद होत आहे. मात्र, तरीही त्याला वारंवार संघात स्थान दिले जाते. या उलट दिनेश कार्तिकने सरस कामगिरीत सातत्य राखूनही त्याचे संघातील स्थान कायम राहात नाही. बीसीसीआय, निवड समिती, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड व कर्णधार रोहित शर्मा पंतचे इतके लाड का करत आहेत, असा सवालही आता चाहत्यांनी विचारला आहे.
पाकिस्तानविरुद्ध पराभूत झालेल्या भारतीय संघाचा श्रीलंकेशी मंगळवारी सामना झाला. या सामन्यात पंतचे स्थान कायम राखले गेले व किफायतशीर गोलंदाजी केलेल्या नवोदित रवी बिष्णोईला बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्याच्या जागी ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्विनचा संघात समावेश केला गेला.
पराभव स्वीकारल्यावरही भारतीय संघ सुमार कामगिरी करत असलेल्या खेळाडूंना बाहेर काढत नसेल तर मग त्यांच्या मनात काय चालले आहे हेच समजेनासे झाले आहे. सतत अपयशी ठरूनही पंत संघात कायम राहातो व आयपीएल स्पर्धेपासून भरात असलेला व फिनिशऱची भूमिका यशस्वी रत असलेला कार्तिक संघाबाहेर बसतो, यात कोणाला स्वार्थ दडला आहे, असा संतप्त सवालही चाहत्यांनी केला आहे.